खोटी कारणे दाखवत प्रवासी पास मिळवून येणाऱ्या उच्चभ्रूंमुळे पाचगणी, महाबळेश्‍वरला धोका

Satara
Satara

भिलार (जि. सातारा) : पाचगणीत कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले असताना शहर व परिसरामध्ये सध्या मुंबई, पुण्यासह परराज्यांतून अनेकजण खोटी कारणे दाखवत प्रवासी पास मिळवून स्वतःच्या बंगल्यात येऊन राहत आहेत. जिवाची सैर करून दोन ते तीन दिवस राहून पुन्हा परतीचा प्रवास करत आहेत. परिणामी पर्यटननगरीचे स्वास्थ्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, वाढत्या संख्येमुळे प्रशासनही चिंताग्रस्त झाले आहे. 

महाबळेश्वर तालुक्‍यात अनेक ठिकाणी मुंबई, पुणे तसेच परराज्यांमधील अनेकांचे बंगले आहेत. हे बंगलेधारक कोरोना विषाणूच्या काळात पुणे, मुंबईत त्रस्त झाले आहेत. त्यामुळे थोडासा विरंगुळा वाटावा म्हणून आपल्या मित्र परिवार, नातेवाईकांच्या जथ्थ्यासह सध्या पाचगणी, महाबळेश्वरमध्ये असलेल्या स्वतःच्या बंगल्यात शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत खोटी कारणे दाखवून येत आहेत. त्यामुळे महाबळेश्वरातील स्थानिक पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायतींवर नाहक ताण येत आहे. 

महाबळेश्वर तालुक्‍यात स्थानिक मुंबईकर गावाला मोठ्या प्रमाणामध्ये आले असले तरी त्या त्या गावाने त्यांना होम क्‍वारंटाइन करून काळजी घेतली आहे. परंतु, फक्त पाचगणी शहरात असे 600 च्या आसपास लोक आपल्या बंगल्यात दाखल झाले आहेत. शासनाने महाबळेश्वर, पाचगणी परिसरात येणाऱ्या बंगलेधारकांच्या कारणांची सत्यता पडताळूनच प्रवासी पासास परवानगी द्यावी. खोटी कारणे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. म्हणजे अशा स्वतःचा विरंगुळा व स्थानिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या व्यक्तींना चाप बसेल. 

एकीकडे शासनाने मुंबईकरांना पास बंद केलेले असताना या धनिकांना पास कसे मिळताहेत, हा प्रश्न गंभीर आहे. हे बंगलेधारक सर्रासपणे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून कोरोनाच्या फैलवास उत्तेजन देत असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्रवासी पास देताना दिलेल्या कारणांची शहानिशा काटेकोरपणे केल्यास सदर गोष्टीवर नियंत्रण बसून पर्यटननगरी सुरक्षित राहील. 

होम क्वारंटाइन खुलेआम फिरतात बाजारपेठेत 

मुंबईवरून येऊन होम क्वारंटाइन होऊनही या लोकांच्या गाड्या बाजारपेठेत मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे असे लोक बाजारपेठेत फिरले तर कोरोना संसर्गाचा मोठा धोका संभवत आहे. त्यामुळे क्वारंटाइन केलेले लोक खुलेआम बाजारपेठेत फिरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com