Satara News : रामजी आंबेडकरांची शासन कधी दखल घेणार?

मायणी परिसरात स्मारक उभारण्याची मागणी; चरित्रकार खैरमोडेही दुर्लक्षित
Demand Ramji Ambedkar memorial in Mayni Biographer Khairmode satara
Demand Ramji Ambedkar memorial in Mayni Biographer Khairmode satarasakal

कलेढोण (जि. सातारा) : मायणी ब्रिटिशकालीन तलावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर हे सन १८९६ च्या सुमारास सुभेदार होते. त्यांच्या देखरेखीखाली मायणीच्या तलाव व पगार वाटपाचे काम सुरू होते. मायणी, गोरेगाव (ता. खटाव) येथे डॉ. आंबेडकरांचे बालपण गेले. त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे हे खटाव तालुक्यातील पाचवडचे.

मात्र, हा इतिहास लिहिणारे चरित्रकार खैरमोडे व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या इतिहासाची शासन कधी दखल घेणार? त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मारक कधी उभारणार? हा सवाल आंबेडकर अनुयायी व चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.

डॉ. आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी हे मायणीत वास्तव्यास होते. याबद्दल चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे आपल्या दुसऱ्या खंडातील ‘रमाईचा संसार’ या लेखात लिहितात, की रविवार ८ एप्रिल १९२३ रोजी सकाळी नऊ वाजता अनेक लोक बाबासाहेबांच्या मुंबई येथील खोलीत जमले होते. उच्च शिक्षणामुळे बाबासाहेबांचे हारतुरे देऊन त्यांचे स्वागत केले. विविध विषयावर चर्चा करून सर्वजण घरी निघाले.

मला बाबासाहेबांनी थांबवून घेतले. माझे वाचन लेखन याविषयी विचारून घेतले. तेव्हा बाबासाहेब आपले लहानपण वाचन वगैरे आठवणी सांगू लागले. त्यात त्यांनी मायणी, गोरेगाव (ता. खटाव), माहुली (ता. खानापूर) येथे बालपणाचे माझे काही दिवस गेल्याचे सांगितले. ही गावे चरित्रकार खैरमोडे यांच्या शिवेवरची आहेत. खैरमोडेंना डॉ. बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास लाभल्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या चरित्राचे बारा खंडांत लेखन केले.

बहिष्कृत भारत या पत्राला पुरेसे वर्गणीदार न मिळाल्याने वर्षभरात पाचशे रुपये कर्ज झाले. काही वर्गणीदार समंजस होते. त्यापैकी मायणीतील ज्योतिबा दारकू झोडगे होते. तेही सुभेदार रामजी यांच्या हाताखाली १८९६ च्या सुमारास नोकरीस होते. त्यांना वर्गणी वेळेवर पाठवता आली नाही म्हणून दंड पाठविला. त्यांचे डॉ. बाबासाहेबांनी पत्र पाठवून त्यांचे आभार मानले.

त्या पत्राची झोडगे रोज पूजा करत. मायणी ही भूमी डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. मायणीतील तलाव बांधणीतील सुभेदार रामजी आंबेडकरांचे योगदान, डॉ. आंबेडकर यांचे चरित्रकार भवानराव खैरमोडेंचा इतिहास जतन करण्याची व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मायणीत सामाजिक न्याय विभागाने स्मारकासाठी जागा पाहून केवळ प्राथमिक पाऊल उचलले आहे. त्यासाठी विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

मायणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या जाज्वल्य शिक्षण निष्ठेमुळे व ग्रंथ प्रेमामुळे डॉ. बाबासाहेबांसारखा विश्वविख्यात विचारवंत घडला. हा ऐतिहासिक वारसा जपला जावा, म्हणून मायणी येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मारक व्हावे. तेथे भव्य असे ग्रंथालय, अभ्यासिका व विहार झाल्यास ते नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांच्या नावाने अभ्यासिका तयार व्हावी.

- बाळासाहेब कांबळे, रमाई चरित्राचे लेखक व साहित्यिक, मायणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com