Home Fire : ...त्यांच्या ४० वर्षांच्या कष्टाची क्षणात राख; वृद्ध दांपत्य शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

आयुष्यभराची कमाई पंधरा दिवसांपूर्वी घराला लागलेल्या आगीत जळून खाक.
Tetamewadi Home Fire
Tetamewadi Home Firesakal
Summary

आयुष्यभराची कमाई पंधरा दिवसांपूर्वी घराला लागलेल्या आगीत जळून खाक.

ढेबेवाडी - आव्हानात्मक कौटुंबिक परिस्थितीत उपजीविकेसाठी मुंबई गाठली. छोट्याशा खोलीत संसार मांडून खानावळ सुरू केली अन् पती व मुलांच्या मदतीने रात्रीचा दिवस करून तब्बल ४० वर्षे ती नेटाने चालवलीही.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात जीव वाचविण्यासाठी मुंबईकरांचा लोंढा गावाकडे धावला, आम्हीही त्यात होतो. आयुष्यभर कष्टाने कमावलेली जमा पुंजी घेऊन गावी आलो. डोंगरात एकट घर म्हणून चोरीच्या भीतीनं बॅरलमध्ये ठेवलेली ही आयुष्यभराची कमाई पंधरा दिवसांपूर्वी घराला लागलेल्या आगीत जळून खाक झाली. चाळीस वर्षांच्या कष्टाची डोळ्यासमोर राख होताना पाहतानाचे दुःख न विसरता येण्यासारखे आहे. काळगाव (ता. पाटण) विभागातील दुर्गम डोंगरात वसलेल्या तेटमेवाडीतील तारुबाई यशवंत तेटमे (वय ६५) हुंदके आणि अश्रूंना मोकळी वाट करून देत सांगत होत्या.

तेटमेवाडीतील यशवंत महादू तेटमे (वय ७५) आणि तारूबाई यांच्या घराला २८ मार्चला दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीत धान्य, प्रापंचिक साहित्य, टीव्ही, कपडे, घराच्या बांधकामासाठी ठेवलेली दीड लाखाची रोकड, २५ तोळे सोने आगीत जळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. या घटनेनंतर पंचनाम्याचे सोपस्कार होऊन १५ दिवस उलटायला आले तरीही शासकीय आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. शेजाऱ्याच्या घरात या वृद्ध दांपत्याने आश्रय घेतला असला, तरी तेथील वास्तव्यावर मर्यादा आहेत. पावसाळा जवळ आल्याने निवारा पुन्हा उभा करण्याच्या विवंचनेत हे दांपत्य आहे. आज घटनास्थळी भेट दिली. जवळच झाडाखाली तेटमे दांपत्य हताशपणे बसून होते.

बोलते केल्यावर त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. मुंबईत ४० वर्षे खानावळ चालविताना घेतलेले कष्ट, आग ओकणाऱ्या स्टोव्ह पुढे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालणारी कसरत. मुंबई सोडल्यानंतर गावाकडे सावरलेला प्रपंच हा सगळा कष्टमय जीवनपट त्यांनी डोळ्यांसमोर उभा केला. गावाकडे या दांप‍त्याने पंचवीस शेळ्या पाळलेल्या होत्या. घटनेपूर्वी काही दिवस अगोदर त्या विकून आलेले पैसेही त्यांनी घरात ठेवले होते. आगीत तेही जळाल्याचे त्यांनी सांगितले. तेटमे दांप‍त्याची दोन्ही मुले नोकरीनिमित्त मुंबईस असतात. घटनेनंतर त्यांनी गावी येऊन आपल्या आईवडिलांना धीर दिला. आयुष्यभर कष्ट उपसून जतन करून ठेवलेली जमापुंजी आगीत खाक झाल्याचे मोठे दुःख तेटमे दांपत्याला असून, त्यांच्या या दुःखावर शासन कशी फुंकर घालतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com