कृष्णाकाठी दहा पंचायतींना निवडणुकांचे वेध; जानेवारीत बिगुल वाजण्याची शक्‍यता!

कृष्णाकाठी दहा पंचायतींना निवडणुकांचे वेध; जानेवारीत बिगुल वाजण्याची शक्‍यता!

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनामुळे प्रशासकांची नियुक्ती करून पुढे ढकलेल्या कृष्णाकाठावरील दहा ग्रामपंचायतींना निवडणुकांचे वेध लागले आहेत. ग्रामपंचायतींवरील वर्चस्वासाठी राजकीय आखाड्यावर आतापासूनच डावपेचांची आखणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली व नुकतीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली, तर पुढील टप्प्यात जिल्हा सहकारी बॅंक, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती, तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येऊ घातली असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाल्याने पुढील महिनाअखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्‍यता असल्याने ऐन थंडीत कृष्णाकाठी राजकीय पटलावरील धुरळा उडणार आहे. 

जून-जुलै महिन्यात विभागातील दहा ग्रामपंचायतींच्या मुदत संपल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे निवडणूक घेण्यास अडचण असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून शासकीय अधिकारी असलेल्या प्रशासकांच्या हाती शासनाने कारभार सोपवला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यानंतर देश व राज्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू झाल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्या या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या प्रसिद्धी व हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्या-त्या गावातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात होणाऱ्या तालुका पातळीवरील निवडणुकांची नांदी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने गावपातळीवर आपलेच वर्चस्व राखण्याचा महाआघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी राजकीय डावपेच आखण्यास आपले कसब पणाला लावले आहे. 

कृष्णाकाठावर भाजपचे नेते अतुल भोसले गटाचे प्राबल्य दिसते आहे. त्यांच्या वर्चस्वाला छेदण्यासाठी महाआघाडीने "फिल्डिंग' लावली आहे. गत महिन्यात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गट एकत्र आले. महाआघाडीच्या ताकदीस उंडाळकरांचेही बळ मिळणार आहे. विभागात विशेषतः कार्वे, शेरे, शेणोली, वाठार, बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. त्या गावांत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. कार्वे व शेरे येथे भोसले गटाची सत्ता आहे, तर शेणोली व वाठार येथे समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत केलेल्या आघाडीची सत्ता आहे. त्या गावातील सत्तासंघर्षाबरोबर कोडोली, खुबी, कालवडे, मालखेड, बेलवडे बुद्रुक येथील निवडणुकीत चांगलेच घमासान होणार आहे, तर नव्याने अस्तित्वात आलेल्या संजयनगर (शेरे) येथील पहिली निवडणूक जिंकून इतिहास घडवण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

सरपंच आरक्षण सोडतीची आतुरता 

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया गतीने सुरू आहे. त्या प्रक्रियेवर लक्ष देणाऱ्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना सरपंच आरक्षण सोडतीचीही आतुरता लागली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com