कृत्रिम टंचाईतून चढ्या दराने विजेची खरेदी; राजू शेट्टींचा आरोप

सर्वसामान्य ग्राहकांवर भूर्दंड पडत आहे
raju shetti
raju shettisakal

सातारा : राज्यात विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करून खासगी वीज चढ्या दराने खरेदी केली जात आहे. याचा सर्वसामान्य ग्राहकांवर भूर्दंड पडत आहे. याविरोधात आपण आवाज उठविणार असून, जनतेच्या पैशावर कोणी दरोडा टाकत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, राज्यात सत्ताधारी व विरोधकांचे राजकीय टोळी युद्ध सुरू असून, भाजपमध्ये शेतकऱ्यांना बुडविणारे कारखानदार नाहीत का, महाविकास आघाडीत सगळेच साधुसंत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

श्री. शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲड. विजय चव्हाण उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, ‘‘महावितरण कंपनी वाढीव दराने वीज खरेदी करत आहे. महावितरणची दहा हजार मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असताना चार हजार मेगावॉटची यंत्रणा तशीच थांबून आहे. त्याला कोळसा, गॅस उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर सर्वाधिक आहेत. महावितरणची क्षमता असूनही खुल्या बाजारातून खासगी वीज खरेदी केली जात आहे. याचे पैसे सर्वसामान्य ग्राहक भरतो आहे. यावर महाजनकोने क्षमता वाढविणे हाच उपाय असताना खुल्या बाजारातून वीज खरेदी करून भ्रष्टाचार केला जात आहे.’’

यावर आपण आवाज उठविणार का, या प्रश्नावर शेट्टी म्हणाले, ‘‘आम्ही निश्चित आवाज उठविणार असून, हा जनतेचा पैसा असून, यावर दरोडा पडणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.’’ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करणे व आवाज उठविणे हे आमचे काम आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘‘ही चळवळ आमची रोजीरोटीचे साधन नाही. आमचे कर्तव्य आम्हाला हाक मारते. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो. सध्या राज्यात सत्ताधारी व विरोधक सोईस्करपणे एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. राज्यात एक प्रकारचे राजकीय टोळी युद्ध चालू आहे.’’ सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या बाजूने आम्ही आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला तुरुंग नवीन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानीची भूमिका पाच एप्रिलला

सध्या राज्यात सत्ताधारी व विरोधक या दोघांचाही तुम्हाला अनुभव आहे. या दोघांबद्दल तुमची काय भूमिका राहणार आहे, असे विचारले असता श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘त्यांच्याबद्दल येत्या पाच एप्रिलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये निर्णय घेतला जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com