धक्कादायक! शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येची प्रशासनास मागितली परवानगी

धक्कादायक! शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येची प्रशासनास मागितली परवानगी

कोरेगाव : शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये समावेश होत नसल्याने बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटीच्या सुमारे 22 सभासद शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
 
यासंदर्भात बोरजाईवाडी सोसायटीचे सभासद डॉ. दीपक बनसोडे यांच्यासह 22 सभासदांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की बोरजाईवाडी गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. सन 2015-16 मध्ये राज्यात महायुतीच्या शासन काळात दुष्काळ पडला आणि महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार बोरजाईवाडीचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश झाला. हे गाव पूर्वी किन्हई महसूल मंडलामध्ये होते. महसूल मंडलांच्या पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कुमठे मंडलामध्ये झाला. दरम्यान, मंडल पुनर्रचनेच्या प्रक्रियेत दुष्काळग्रस्त गावांच्या यादीची माहिती वर्ग झाली नाही आणि कुमठे मंडल हे बागायती क्षेत्र असल्यामुळे बोरजाईवाडीलाही तोच निकष लावण्यात आला. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून घेतलेली शेती कर्जे माफ झाली आहेत. आम्हाला मात्र कर्ज थकबाकीचे बक्षीस मिळाल्यात जमा आहे. याप्रश्नी जिल्हा बॅंकेचे पदाधिकारी, संचालकांसह अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीविषयी ठोस आश्‍वासन मिळाले नाही. विकास सोसायटी आणि सहकार विभागाकडे चौकशी केली असता, शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांमध्ये किसान क्रेडिट कर्ज योजनेचा पात्र अथवा अपात्र या दोन्ही विभागांमध्ये समावेश होत नसल्याचे सांगण्यात आले. बॅंक आणि सोसायटीने त्या-त्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

पाठ दुखीच्या त्रासापासून हवीय मुक्तता? हे उपाय करा 

दरम्यान, विकास सोसायटीच्या संचालक मंडळाच्या दहा डिसेंबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्याचा ठराव केला असून, तो जिल्हा बॅंकेस सादर केला आहे. त्यानुसार बॅंकेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही होत नसल्यामुळे आम्हास सामूहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाने डॉ. दीपक बनसोडे यांना गेल्या 17 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की "आपले निवेदन कार्यवाहीसाठी उपनिबंधक कार्यालयास पाठवले असून, आपण योग्य त्या मार्गाचा अवलंब करून न्याय मागावा आणि सामूहिक आत्महत्येपासून आपण परावृत्त व्हावे.' 

कर्जमाफी योजना शासनाची : सुनील माने 

या संदर्भात जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले,""शेतकरी कर्जमाफी योजना राज्य शासनाची असल्याने बोरजाईवाडीतील शेतकऱ्यांचा विषय राज्य शासनाशी निगडित आहे. हा विषय शासनस्तरापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आम्हीही शेतकरीच आहोत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो.'' 

कॉलेज सुटल्यावर मैत्रिणीसह घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड; खटावच्या तिघांना कारावासाची शिक्षा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com