
कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे घेतली होती. त्यात त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी खासगी हॉस्पिटलनी रुग्णांना नाकारू नये, ऍन्टीजन टेस्ट करून रुग्णांना तपासावे, आवश्यकतेनुसार जंबो फॅसिलिटी सेंटर सुरू करावे, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा वॉक इन इंटरव्ह्यूवने भराव्यात, तातडीने जादा व्हेंटिलटरची सोय करण्यात येईल यांसह अन्य घोषणा केल्या. त्याला दोन आठवडे झाल्यानंतरही त्यांच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्याची कार्यवाही शून्य असून रुग्णांची बेडअभावी तडफड सुरू आहे. त्यावर आता तातडीने उपचार करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी येथे बैठक घेतली. त्यासाठी ज्येष्ठ नेते पवारही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी, मृत्यूदर कमी करून रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटल कोरोना होईल, या भीतीने रुग्णांना तपासत नाहीत, ही गंभीर बाब आहे. संबंधित खासगी हॉस्पिटलनी ऍन्टीजन टेस्ट करून घ्यावी. त्याचे 15 मिनिटांत निदान होते. त्यानंतर रुग्णांवर उपचार करावेत. मात्र, कोणत्याही रुग्णाला नाकारू नये, असे जाहीर केले होते. मात्र, बहुतांश ठिकाणी त्याउलट स्थिती आहे. त्याचबरोबर त्यांनी खासगी हॉस्पिटलनी 80 टक्के बेड हे कोरोनासाठी ठेवले पाहिजेत, अशीही घोषणा केली होती. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
ऍन्टीजेन टेस्टमुळे रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची मात्र तेवढ्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यामुळे रुग्णांना बेडसाठी "वेटिंग'वर राहावे लागत आहे. परिणामी काहींना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी जंबो फॅसिलिटी सेंटर सुरू करावे, असेही जाहीर केले होते. त्याचबरोबर त्यांनी मध्यंतरी आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना फोनवरून साताऱ्यासाठी जादा बेड उपलब्ध करून देण्यास सांगितल्याचेही जाहीर केले होते. मात्र, ते ही लालफितीतच अडकले आहे. ही स्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा वॉक इन इंटरव्ह्यूवने भराव्यात, असेही जाहीर केले होते. त्यावरही ठोस कार्यवाही झालेली नाही.
बेडची माहिती राहिली कागदावर
आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना दररोज कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचे किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती जाहीर करावी, अशाही सूचना केल्या होत्या. रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही सूचनाही आरोग्य यंत्रणेकडून पाळण्यात आलेली नाही. त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.
एकाही कारखान्याचा नाही पुढाकार
कोरोनाचे मोठे संकट आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र, सामाजिक दायित्व म्हणून सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन कोरोनासाठी स्वतंत्र छोटेसे अद्ययावत रुग्णालय सुरू करावे आणि ते पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे कारखानदारांना केले होते. ज्येष्ठ नेते पवार यांची जिल्ह्यावर "कमांड' आहे. मात्र, त्यांच्या घोषणेला दोन आठवडे होत आले तरी जिल्ह्यातील एकही कारखानदार त्यासाठी पुढे आलेला नाही, हेही आश्चर्य आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.