महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या नेमकं कारण

महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या नेमकं कारण

भिलार (जि. सातारा) : संततधार व मुसळधार पावसाचा फटका महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांना बसला असून कोरोनाच्या काळातील आणखी एका संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी देखील अशाच पावसाचा सामना या भागातील शेतक-यांना करावा लागला होता. संततधार कोसळणा-या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारात या पिकांना कवडीमोल किंमत मिळणार असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वरच्या पूर्व भागात खिंगर, आंब्रळ, दांडेघर, राजपुरी, गोडवली, पांगारी, भोसे, भिलार, कासवंड, दानवली, घोटे घर या परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरी बरोबरच खरीप हंगामाची वाटाणा, बटाटा, नाचणी, घेवडा ही पिके घेतात. ज्या महिन्यात पावसाचे प्रमाण असते त्या महिन्यात पावसाने ओढ दिली आणि ज्यावेळी प्रमाण कमी होते त्यावेळी पावसाने मुसळधार दिली, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. 

संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत, त्यामुळे तालुक्याच्या पूर्वभागातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बटाटा, हायब्रीड, वाटाणा या पिकांना धोका पोहोचला असून बऱ्याच शेत जमिनीतील पिके पाणी साचल्याने कुजू लागली आहेत. 

त्याच बरोबर अति पावसामुळे पिकावर रोग पडू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत. जून महिन्यात वेळेवर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या महिन्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. कृषी विभागाच्या वतीने ही पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

खरिपाचा हंगाम वाया गेल्याने आशाच मावळल्या

सध्या कोरोनामुळे अगोदरच हंगाम वाया गेल्याने खरिपाच्या आशा होत्या, परंतु पावसाने त्याही मावळल्या आहेत. अति पावसाने शेतात पाणी साचल्याने पिके हातची जावू लागली आहेत. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून, नुकसान भरपाई देवून आम्हाला शासनाने दिलासा द्यावा. मागील वर्षी देखील असाच फटका पिकांना बसला होता. मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाचा जोर नसला तरी, संततधार कोसळणा-या पावसामुळे पिके कुजू लागली आहेत. प्रशासनाने होणा-या पीक नुकसानीकडे लक्ष देऊन, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप अंब्राळे यांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com