मंत्री असावा तर असा; लग्न समारंभासाठी व-हाडींची वाढवली मर्यादा

मंत्री असावा तर असा; लग्न समारंभासाठी व-हाडींची वाढवली मर्यादा

सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी सहा या वेळेत संचार बंदी लागू केल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन ), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

एक फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. 

लग्न समारंभाला वधू कडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करावी. राज्यासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 100 टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही तरी ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे. 

सातारा जिल्ह्यात महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलिस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे अचानक महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी. कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

दरम्यान सातारा जिल्ह्यात लग्न समारंभासाठी यापुर्वी केवळ 50 लाेकांची उपस्थिती बंधनकारक हाेती. या नियमाचे उल्लंघन करणा-यांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले हाेते. आता 50 ची मर्यादा 100 पर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये विशेषतः लग्नाळूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आहात? तपासणी करा! अन्यथा गुन्हा दाखल हाेईल
नियमित कर्ज फेडणारे शेतकरी वाऱ्यावर!

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com