
सातारा : यंदा जिल्ह्यात धुवाँधार पाऊस झाल्याने धरणे, नदी, नाले, तलाव तुडुंब भरुन वाहताना दिसत आहेत. याचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला असून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पिके जोमात पिकवली जात आहेत. सद्य: स्थिती प्रमुख सहा धरणांमध्ये १४८ टीएमसीवर पाणीसाठा आहे. यामधील चार धरणांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा टिकून आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने चांगला पाऊस झाला. या पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. यावर्षी मात्र, धरणे उशिरा भरली, तर यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरुवात झाली. काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, धरणे भरणार का अशी चिंताही निर्माण झाली होती. पण, ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरुवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा टिकून आहे.
जिल्ह्यातील कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्य:स्थितीत या धरणांमध्ये १४८.०६ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यातच यातील कण्हेर, धोम, उरमोडी आणि तारळी या धरणांत किरकोळ स्वरुपात पाण्याची आवक होत आहे. तसेच अद्यापही सिंचनासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात आलेले नाही. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उरमोडीच्या पॉवर हाऊसमधून नदीपात्रात २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणही पूर्ण भरलेले आहे. सध्या सांडव्यातून नदीत ४७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटलेली दिसत आहे. यंदा परतीच्या पावसानेही ऐनवेळी हजेरी लावल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.