कोरेगाव (जि. सातारा) : कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये पत्राद्वारे केलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने विरोधी पक्षांना विचारात घेऊन त्याचवेळी काही उपाययोजना केल्या असत्या, तर देशावरचे कोरोनाचे संकट टळले असते; परंतु केंद्र सरकारने राहुल गांधी यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने देशावर कोरोनाचे संकट ओढवले असून, या संकटाला भाजपप्रणीत केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली.
खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव तालुका कॉंग्रेसच्या वतीने येथील जुना मोटार स्टॅंडवर कोरोना योद्ध्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. जाधव बोलत होते. ते म्हणाले, "खासदार राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने काही उपाययोजना, नियोजन जर केले असते, तर देशावर आज आलेले कोरोनाचे संकट कदाचित टळले असते.' कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका, त्याऐवजी कोरोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर, नर्स, पोलिस, होमगार्ड, नगरपालिका व नगरपंचायतीचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदींसह कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन द्या', अशी सूचना राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिलेली आहे. त्यानुसार या ठिकाणी मनोहर बर्गे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
यावेळी ऍड. विजयराव कणसे यांचेही भाषण झाले. यावेळी नगरपंचायतीचे अधीक्षक बाळासाहेब सावंत, धनंजय भुजबळ, होमगार्ड ज्योती जाधव, सोमनाथ बोतालजी आदींचा सत्कार करण्यात आला. कोरेगाव युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर बर्गे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र भोसले यांनी आभार मानले. याप्रसंगी ऍड. जयवंतराव केंजळे, किरण बर्गे, अविनाश फाळके, नितीन ओसवाल, अजित भोसले, ऍड. श्रीकांत चव्हाण, आनंद जाधव, केदार केंजळे, सोमनाथ शिंदे, कल्पेश ओसवाल, सागर गायकवाड, दीपक कांबळे, जयवंत घोरपडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.