कऱ्हाड : मीटर रीडिंगद्वारे तोटा भरून निघणार?

एक एप्रिलपासून नियोजन; पाणी योजनेच्या तोट्याला जबाबदारांवर कारवाईची गरज
Karhad Municipality satara
Karhad Municipality satarasakal

कऱ्हाड: शहरातील २४ तास पाणी योजना १४ वर्षांपासून रखडली आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. योजनेचे शिवधनुष्य प्रशासनाने उचलले असून त्याची एक एप्रिल अशी डेडलाईनही निश्चित केली आहे. या दिवसापासून शहरात पाणीपुरवठ्याला मीटर लागणार आहे. त्यानंतर २४ तास पाणी योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, तीच पाणीपुरवठ्याची योजना दरवर्षी साडेचार कोटींच्या तोट्यात जात होती. त्या तोट्याला जबाबदार कोण, याची चौकशी करताना प्रशासन कुचराई करताना दिसते. मीटरप्रमाणे रीडिंग घेऊन पाणीपट्टी आकारणीव्दारे तोटा भरण्याचे नियोजन असताना तोट्याला जबाबदार असणारांवर कारवाईलाही तितकीच तत्परता हवी, हेही वास्तव आहे.

पाणीपुरवठा योजना सहा वर्षांपासून तोट्यात आहे, असे प्रशासन सांगत असतानाही पाणी कपातीचे धोरण का राबवले गेले नाही, त्याला जबाबदार कोण आहे, हाच खरा प्रश्न आहे. प्रशासनाच्या अहवालाला गांभीर्याने न घेता थेट केराची टोपली दाखवणे योग्य नाही. पाणी कपातीचा विचार केल्यास जनता अंगावर येईल, असे राजकीय फंडे वापरून तोटा भरून काढण्याकडे झालेले दुर्लक्ष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. वास्तविक २४ तास पाणी योजना एक एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्पष्ट केले आहे.

ही योजना सुरू होण्यापूर्वी मीटर रीडिंग होईल. मीटरची अंमलबजावणी वाटते तितकी सोप्पी नाही. मीटर रीडिंगचे दर वर्षापूर्वी ठरले आहेत. अर्थात त्याला नगरसेवकांनी मान्यता देवून ते दाबून ठेवले होते. त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होत आहे. त्यातील तांत्रिक अडचणींचे आव्हान मात्र प्रशासनाला पेलावे लागणार आहे. त्यासोबत तोट्याची चौकशीची गरज आहे. ती व्हावी, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. मीटरप्रमाणे होणाऱ्या रीडिंगने तोटा भरून निघणार आहे, असे प्रशासनाचे नियोजन आहे. त्या तोट्याची झळ सामान्यांनाच सोसावी लागणार असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे तोट्याला जबाबदार असणाऱ्या घटकांवरही कारवाईची गरज आहे.

मीटर आकारणीचा सोयीस्कर विसर

या प्रकारांतून नगरसेवकांत समन्वय नव्हताच, हेही स्पष्ट होते. मुदत संपल्यानंतर शासन पाणी कपातीवर भर देत असताना तेच नगरसेवक आक्रमकतेच्या भूमिकेतून लोकांसमोर वेगळी भूमिका मांडत प्रशासनाला वेठीस धरत आहेत. त्याच नगरसेवकांनी २५ फेब्रुवारीच्या सभेत मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारणीला मंजुरी दिली आहे, याचा त्यांना विसर पडतो आहे, हेही आश्चर्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com