माण तालुक्यात बिनविरोधला तिलांजली; स्थानिक गटांतच रंगणार लढती

माण तालुक्यात बिनविरोधला तिलांजली; स्थानिक गटांतच रंगणार लढती

दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.
 
बुधवारी (ता.30) तहसील कार्यालय परिसरात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळच्या साडेपाचपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असली, तरी रात्रीचे सात वाजले तरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक ठिकाणी बिनविरोधचा इस्कोट झाल्याने शेवटच्या दिवशी इच्छुकांनी पळून अर्ज भरले. मात्र, हे अर्ज भरताना अनेकांच्या नाकीनऊ आले. काही ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध झाल्या, तर काही जागांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले.

कॉंग्रेस करणार बांगलादेश मुक्ती संग्रामाची ५० वर्षे साजरी; ए. के. अँटनींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
 
निवडणूक असलेली गावे, जागा व दाखल अर्ज पुढीलप्रमाणे, मार्डीत 13 जागांसाठी 25 अर्ज, पानवण 11 साठी 30, रांजणी 9 साठी 37, वरकुटे म्हसवड 11 साठी 23, जांभुळणी 11 साठी 42, कुकुडवाड 13 साठी 35, गोंदवले बुद्रुक 15 साठी 60, शिंगणापूर 11 साठी सत्तर पेक्षा जास्त, धामणी 9 साठी 31, वडजल 7 साठी 25, देवापूर 9 साठी 23, पळसावडे 7 साठी 13, बोथे 7 साठी 14, शिरवली 7 साठी 17, शेवरी 9 साठी 24, जाशी 11 साठी 20, वारुगड 7 साठी 21, श्रीपालवण 7 साठी 16, भांडवली 7 जागांसाठी 16, कुळकजाई 9 साठी 32, शिंदी खुर्द 7 साठी 15, पिंपरी 9 साठी 28, वाकी 7 साठी 8, भालवडी 9 साठी 26, लोधवडे 9 साठी 11, वडगाव 9 साठी 33, येळेवाडी 7 साठी 29, बोडके 7 साठी 16, शिंदी बुद्रुक 7 साठी 15, पर्यंती 9 साठी 32, संभूखेड 7 साठी 16, दिवडी 7 साठी 17, सुरुपखानवाडी 7 साठी 18 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण साधारण आठशेपेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 

गंगोती 9 जागांसाठी 9, मोही 11 जागांसाठी 11 व इंजबाव 9 जागांसाठी 9, तोंडले 7 जागांसाठी 7 अर्ज दाखल झाल्यामुळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या बोडके गावात सात जागांसाठी 16, तर राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडेत नऊ जागांसाठी 11 अर्ज दाखल झाले आहेत.
 

माण तालुक्‍यात रंगणार स्थानिक गटातच लढती 

बिजवडी (जि. सातारा) : विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर थंड पडलेले माण तालुक्‍यातले राजकीय वातावरण ऐन थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा ग्रामपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने गरमागरम झाले आहे. त्यात सर्वच राजकीय नेतेमंडळी सक्रिय झाल्याचे दिसून येतात. या निवडणुकीत तालुक्‍यात महाविकास आघाडी दिसण्याची शक्‍यता कमी असल्याने पक्षाऐवजी स्थानिक गटांतच लढती रंगतील, अशी स्थिती आहे. 

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर

माण तालुक्‍यात 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून त्यातील काही गावच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. मात्र, उर्वरित गावच्या निवडणुका तालुक्‍यातील नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर लढवल्या जात आहेत. त्यात सरपंचपदाचे आरक्षण निकालानंतर असल्याने निवडून येऊन वेगळेच आरक्षण पडले तर काय करायचे, या भीतीने सरपंचपदाची स्वप्ने घेऊन गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांची अडचण झाली आहे, तर काही प्रस्थापितांनी बिनविरोध निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकानंतर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या, जिल्हा बॅंक, बाजार समितीच्या निवडणुकांचाही बिगुल वाजणार असल्याने माण तालुक्‍यात जोरदार राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 

वॉर्ड रचनेनूसार पालिकांच्या निवडणुकांसाठी लगीनघाई सुरु

आमदार जयकुमार गोरेंची ताकद दिसणार 

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये जावून अटीतटीच्या लढतीत आमदारकीची हॅटट्रिक साधणारे आमदार जयकुमार गोरे यांना मानणारा एक हक्काचा गट तालुक्‍यात आहे. त्यामुळे ते कोठे गेले तरी तो गट त्यांच्याच पाठीमागे जाणार. जिल्हा बॅंकेचे ते संचालकही आहेत. बाजार समितीवरही त्यांचे खंदे समर्थक अरुण गोरे हे सभापतिपदी विराजमान आहेत. त्यामुळे या निवडणुकांत आमदार गटाची ताकद दिसून येईल. 

देशमुख कार्यकर्त्यांची मोट बांधणार 

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अधिकृतपणे हातात "घड्याळ' बांधत राजकारणात आले. विधानसभा निवडणुकीत सर्वांना एकत्र करून "आमचं ठरलंय' टीम तयार करण्यात त्यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या टीमच्या सेनापतीचीही भूमिका बजावत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली. या तुल्यबळ लढतीत त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्वच निवडणुकांत जोरदार लढत देतील, असे चित्र दिसून येत आहे. 

शेखर गोरेंची कसोटी लागणार 

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही माण तालुक्‍यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. तालुक्‍यातील विविध निवडणुकांत त्यांच्या गटाने चांगले यश मिळवले आहे. पंचायत समितीच्या सभापतिपदावरही त्यांच्या समर्थक कविता जगदाळे विराजमान आहेत. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी "घड्याळ' काढून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची उमेदवारी मिळवत त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली. आता त्यांना या निवडणुकीत खरे आव्हान आहे. कारण शिवसेनेची ताकद तालुक्‍यात म्हणावी तशी नाही. जे काही सर्व करायचेय ते त्यांना आपल्याच ताकदीवर करून दाखवावे लागणार आहे. 

विदर्भात १,१४९ शेतकऱ्यांनी आवळला गळ्याभोवती फास, मावळत्या वर्षातील भीषण वास्तव

अनिल देसाईंचे काय ठरलंय... 

जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई यांचा माण तालुक्‍यात एक स्वतंत्र गट आहे. आजपर्यंत त्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा राजकीय प्रवास झाला आहे. माण तालुक्‍यात त्यांचे आमदार गोरे व पोळ गटाचे कधीच जुळून आले नाही. 
माण तालुक्‍यात भाजपलाही एक चांगला चेहरा हवा असताना देसाईंच्या नावाने तो मिळालाही; पण आमदार गोरेंचा भाजप प्रवेश त्यांना आडवा आला. त्यानंतर त्यांनी "आमचं ठरलंय' म्हणत प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचे काम केले. सध्या ते शरीराने भाजपत तर मनाने महाविकास आघाडीसोबत दिसून येत आहेत. 

पोळ गटाची भूमिका महत्त्वाची 

किंगमेकर (कै.) सदाशिवराव पोळ यांच्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. संदीप व मनोज पोळ यांनी राजकीय वारसा चालवत पक्षहित जपण्याबरोबरच आपला पोळ गटही शाबूत ठेवला. मार्डी व गोंदवले जिल्हा परिषद गटात आपल्या कारभारणींना काम करण्याची संधी दिली. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी "आमचं ठरलंय' म्हणत पक्ष बाजूला ठेवत त्यांच्याच पक्षाचे पण अपक्ष उमेदवार असलेले प्रभाकर देशमुख यांचे काम केले. मात्र, त्यानंतर प्रभाकर देशमुख व त्यांचे राजकीय रूसवे फुगवे दिसून आले. पोळ कुटुंबाचे गाव असलेल्या मार्डीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असली तरी तालुक्‍यातील इतर निवडणुकांतही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

कोरोना संसर्गामुळे होणार सव्वाशे वर्षाची परंपरा खंडीत, तामसा येथील ‘भाजी-भाकर’ पंगत रद्द

कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष नेतृत्वाविना 

कॉंग्रेसमधून आमदार जयकुमार गोरे बाहेर पडल्यानंतर या पक्षाला तालुक्‍यात नेतृत्वच उरले नाही. जे पहिल्यापासून कट्टर आहेत तेच पक्ष सांभाळताना दिसून येत आहेत. मात्र, यात नेतृत्व करण्यासारखा एकही चेहरा दिसून येत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जरी माण तालुक्‍याचे असले तरी हा पक्ष आपले अस्तित्वच शोधताना दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी दुरंगी किंवा भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शिवसेना अशा तिरंगी लढती पाहायला मिळतील. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com