चक्रीवादळाचा नेटीझन्सकडून धुरळा!

चक्रीवादळाचा नेटीझन्सकडून धुरळा!

सातारा : सध्या राज्याभोवती चक्रीवादळचं संकट घोंगावत असून दोन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना पवसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेकांचे यात मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, 'सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला', असे सोशल मीडियावर झळकताच नेटिझन्सनी चांगलाच धुरळा उडवून दिला. अनेकांनी फेसबुक, व्हाॅटस्अॅप, ट्वीटर, इन्स्ट्राग्राम या सोशल साईटवरती हटके कंमेंट देत मजेशीर प्रतिक्रीया दिल्या. यामधून काहींना आपापल्या भागातील वास्तव समोर आणत समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.   

यामध्ये पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, घरांची पडझड, पिकांचे नुकसान अशा प्रतिक्रीया व्यक्त केल्या, तर काहींनी या चक्रीवादळाबद्दल हटक्या कमेंट देत लाइक्स मिळवण्याचा प्रयत्न केला. यात ' या चक्रीवादळाने सातारा-पुसेगाव रस्ता परत खराब होणार, त्या वादळाला म्हणावं.. दम असेल तर सातारा-लोणंद मार्गे जा, तिथला रस्ता बघून तिथूनच माघारी निघून जाणार, जाताना आनेवाडी टोल भरुन जा म्हणावं, एकतर त्या रस्त्याचा निकाल लागेल किंवा वादळाचा, वादळ येऊन गेले की तिथला कोरोना जाईल, बघा कोणाला मुंबईला जायचं असेल तर विनाथांबा आहे, निढळ मार्गे जा म्हणावं.., वडूजने लॉंगकट पडलं, हवामान खातं जे सांगेल ते कधीच खरं होत नाही सगळे बोगस भरती आहे तिकडे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तसेच आता मुसळधार पाऊस बोलले ना बघा, आज पाऊस थोडा तरी पडतोय का ते!, मुंबईमध्ये पोचल्या-पोचल्या केमला ऍडमिट होणार.. मणक्याच्या डाॅक्टरकडे, रस्त्यावरून गेलं तर पाठीचा कणाच दुमता होईल, मुंबईला येताना कंदी पेढे घेऊन ये म्हणावं, दम पाहिजे त्याचा लोणंद-सातारा रस्त्यावरून जायचा गायपच होईल, सातारा-लोणंद मार्ग जा म्हणजे परत सातारा जिल्ह्यात येण्याचा विचारपण करणार नाही, वडूजला काय मुक्काम आहे वाटतं, येताना चुना डबी घेऊन ये म्हणावं, मी स्टॉपवरती थांबतो, अशा हटके आणि मजेशीर प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर धुरळा उडवून दिला. 

दरम्यान, या जरी मजेशीर प्रतिक्रिया असल्या तरी काही भागात या चक्री वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतक-यांच्या तोंडचा घास पळवला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था झाली असून काही भागात नद्यांना पूर आल्याने कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काहींच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर आली आहेत. अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com