
कऱ्हाड (जि. सातारा) : वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे 20 हून अधिक गावातील लाइट गेली. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने अनेकांना घरीच विजेवरील ऑक्सिजनची मशिन लावली आहेत. मात्र, पावसाने रविवारी लाइटच गेल्याने अनेकांच्या मशिन बंद झाल्या. त्यामुळे रुग्णांना धापेचा त्रास झाला. परिणामी, त्यातील काही रुग्ण अती सिरियस झाले असून, त्यांच्या बेडसाठी नातेवाइकांनी धावाधाव सुरू केली आहे.
कोरोनाच्या चाचणीसह ऍण्टीजेन चाचणीही वाढवल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जगण्यासाठी ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यांच्यासाठी नातेवाइकांनी घरीच ऑक्सिजन यंत्र नेऊन श्वासाची सोय केली. त्याद्वारे शहरासह तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक रुग्णांना ऑक्सिजन यंत्राद्वारे श्वास दिला जात आहे. त्यामुळे संबंधित रुग्ण बेड मिळेपर्यंत तग धरू शकले आहेत.
रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यादरम्यान अनेक ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला. त्याचा फटका घरीच लाइटवरील ऑक्सिजनची मशिन लावलेल्या रुग्णांना बसला. पावसाने लाइटच गेल्याने अनेकांच्या ऑक्सिजन मशिन बंद पडल्या. त्यामुळे श्वासाअभावी अनेक रुग्णांना धाप लागली. त्यांना पुन्हा यंत्राद्वारे ऑक्सिजन मंगळवारी दुपारी वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मिळाला. दरम्यानच्या काळात साकुर्डी, विजयनगरसह अन्य गावांतील काही रुग्ण अती सिरियस झाले. त्यामुळे त्यांना आता व्हेंटिलेटरची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये बेडसाठी धावाधाव सुरू केली आहे.
निसर्गापुढे यंत्रे ठरली कुचकामी : कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. त्यासाठी अनेकांनी घरीच ऑक्सिजन यंत्रे लावली. मात्र, त्याद्वारे ऑक्सिजन देण्याचे काम सुरू असतानाच रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसातील नुकसानीने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, घरात मशिन लावलेल्यांना ऑक्सिजन मिळाली नाही. त्यामुळे ती यंत्रेही रुग्णांसाठी कुचकामी ठरल्याचेच दिसून आले.
कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर, उंब्रज, मसूर, उंडाळे विभागातील 20 हून अधिक गावांतील वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. तो वीजपुरवठा मंगळवारी दुपारनंतर पूर्ववत सुरू करण्यात आला. पावसामुळे ही समस्या उद्भवली होती, परंतु पुढच्यावेळेस योग्य ती काळजी घेतली जाईल.
-अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता, महावितरण
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.