
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न प्राधान्याने मांडला.
Prithviraj Chavan : महामार्गावरील उड्डाणपुलाबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला दिले महत्वाचे आदेश
मलकापूर : येथे भराव पुलाचे (Karad Bridge) पाडकाम अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात शाळा सुरू होत असून, ५ जूनपर्यंत पुलाचे पाडकाम पूर्ण करण्यात यावे. पुलाचे पाडकाम करून शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक वाहनधारकांची गैरसोय दूर करण्यासाठी रस्ते तयार करावेत, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरण (Highways Authority of India) व डी. पी. जैन कंपनीच्या अधिकारी यांना केली.
कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत या सूचना करण्यात आल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली. बैठकीला जखीणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, डी. पी. जैन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार जैन, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, विरोधी पक्षनेते अजित थोरात, नगरसेवक भास्कर सोळवंडे, नारायण रैनाक, राजू मुल्ला, शहाजी पाटील, रामदास तडाखे यांची उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न प्राधान्याने मांडला. सध्या पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यात काही अपघात झाल्याच्या घटनांवर चव्हाण यांनी लक्ष वेधले. कंपनीने वेगात काम पूर्ण केले असले, तरी जून महिन्यात शाळा सुरू होत आहेत.
शाळा सुरू झाल्यावर मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय व महाविद्यालय, प्रेमलाताई चव्हाण विद्यालय, स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, हौसाई कन्याशाळा, नूतन मराठी शाळा, भारती विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी मांडली.
मनोहर शिंदे यांनी रस्त्याचे काम करताना मलकापूर ते कऱ्हाड या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवरील गायब झालेले ब्लॉक व्यवस्थित बसवावेत अशी मागणी केली. शिवाय पावसाळ्यापूर्वी कऱ्हाड ते पाचवड फाटा यादरम्यान गटारे साफ करून पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.