
सातारा : एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दहा तारखेला मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांनी आतापासून उमेदवार व पॅनेलसाठीची चाचपणी सुरू केली आहे. आता यानंतर सरपंच आरक्षण होऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणुका लढण्याचे संकेत नेत्यांनी दिलेले असल्याने त्यापध्दतीची पॅनेल स्थानिक पातळीवर दिसण्याची चिन्हे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची प्राथमिक तयारी सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. कोरोनामुळे एप्रिलनंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन सर्व अनलॉक झाल्याने पुन्हा एकदा गावपातळीवरील राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने तापू लागले आहे. एप्रिल ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने वॉर्डरचना व आरक्षणांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच गावनिहाय मतदार यादीही तयार करण्यात आली आहे. येत्या दहा डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे केवळ सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यालाही साधारण महिनाभराचा कालावधी जाईल. त्यामुळे गावपातळीवरील पुढाऱ्यांनी आतापासूनच पॅनेल तयार करण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
यावेळेस महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. पण, ग्रामपंचायत पातळीवर पक्षीय निवडणुका होत नाहीत. स्थानिक गटा-तटांतच या निवडणुका होतात. पण, राज्यात महाविकास आघाडीत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते ग्रामपंचायतीसाठी एकत्र येणार का, हा प्रश्न आहे. सध्या जिल्ह्यात बहुतांशी ग्रामपंचायतींवर स्थानिक आमदारांच्या गटाची सत्ता आहे. पण, आघाडी म्हणून एकत्र येण्याचा निर्णय झाल्यास वेगळे चित्र पाहायला मिळेल. कदाचित अनेक ग्रामपंचायती बिनविरोधही होऊ शकतात. पण, त्यासाठी आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचे दोन आणि भाजपचे दोन आमदार आहेत. पण, ग्रामपंचायतींवर आपल्या गटाची सत्ता राहावी, यासाठी प्रत्येक आमदार प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता कमीच आहे. सध्यातरी दहा तारखेला प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीनंतर सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम कधी लागतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच यावेळेस सरपंच जनतेतून निवडला जाणार की सदस्यांतून, या विषयीही निर्णय झालेला नाही. तोही या महिनाभरात होणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील पुढाऱ्यांनी आतापासून गुप्त बैठकांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी : सातारा 133, कऱ्हाड 103, वाई 76, कोरेगाव 56, महाबळेश्वर 42, जावळी 75, पाटण 107, खटाव 90, माण 61, फलटण 78, खंडाळा 57 अशी असणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.