नेर तलावाच्या संरक्षक भिंतीला तडे;तब्बल ५४ किलोमीटरचे कालवे जीर्ण

तब्बल ५४ किलोमीटरचे कालवे जीर्ण; नैसर्गिक अतिक्रमणाच्या समस्येने अस्तित्वही धोक्यात
protective wall of Ner Lake 54 km long canals dilapidated
protective wall of Ner Lake 54 km long canals dilapidatedsakal

विसापूर : खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेर मध्यम प्रकल्पाचे ५४ किलोमीटर अंतराचे कालवे जीर्ण झाले आहेत. त्यातच नेर तलाव नैसर्गिक अतिक्रमणाच्या समस्येने ग्रासला असून, संरक्षक भिंतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प अनेक समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र असून, २६ वर्षे चातकासारखी वाट पाहिलेले जिहे-कठापूर योजनेचे पाणी लाभक्षेत्रातील गावांमध्ये पोचण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेर प्रकल्पाच्या अंतर्गत १५ किलोमीटर लांबीचा नेर मुख्य कालवा, २४ किलोमीटर लांबीचा येरळा उजवा कालवा व १५ किलोमीटर लांबीचा येरळा डावा कालवा असून, तालुक्यातील नेर, पुसेगाव, विसापूर, खातगुण, जाखणगाव, भांडेवाडी, खटाव, भुरकवडी, हुसेनपूर, धकटवाडी, सिद्धेश्वर कुरोली, नायकाचीवाडी, नागाचे कुमठे, दरूज, सुंदरपूर, वडूज, लोणी, काटकरवाडी ही १८ गावे लाभक्षेत्रात येतात. तसेच या गावांमधील दोन हजार ६३६ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येते.

सद्य:स्थितीत हे कालवे मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने नेर मुख्य कालव्याद्वारे सात ते आठ किलोमीटरमध्ये नेर, पुसेगाव, विसापूर, खातगुण या गावांना, येरळा उजव्या कालव्याद्वारे दहा ते ११ किलोमीटरमध्ये भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर, धकटवाडी, सिद्धेश्वर कुरोली या गावांना तसेच येरळा डाव्या कालव्याद्वारे १० ते ११ किलोमीटरमध्ये भांडेवाडी, खटाव, भुरकवडी या गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. तसेच प्रकल्पाच्या मुख्य द्वारापासून येरळा नदीमार्गे पाणी सोडून नेर, पुसेगाव, काटकरवाडी, कटगुण, खातगुण, भांडेवाडी, खटाव, भुरकवडी, सिद्धेश्वर कुरोली या गावांमधील नदीकडेला असणाऱ्या विहिरीना सिंचनाचा लाभ होत असून इतर गावे वंचित राहत आहेत.

दरम्यान, हा तलाव काटेरी झुडपे आणि जलपर्णी वनस्पतींच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या नैसर्गिक अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असून, याचा थेट परिणाम पाणी साठवणुकीवर होताना दिसत आहे. त्यातच तलावाच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून, तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. परिणामी तलावास धोका निर्माण झाला असून, भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता परिसरातील नागरिक बोलून दाखवत आहेत. तरी संबंधित विभागाने यात वेळीच लक्ष घालून नेर मध्यम प्रकल्पाच्या समस्या सोडवून हे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोचावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

तलावाच्या संरक्षक भिंतीला पडलेल्या तड्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

-सचिन पवार, प्रगतशील शेतकरी, नेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com