'एफआरपी'चा प्रश्न चिघळणार?; शेट्टी आंदोलनाच्या पवित्र्यात

'एफआरपी'चा प्रश्न चिघळणार?; शेट्टी आंदोलनाच्या पवित्र्यात

कऱ्हाड (जि. सातारा) : साखर कारखान्यांकडे ऊस गाळपास गेल्यानंतर 14 दिवसांत एफआरपी (किमान आधारभूत किंमत) देणे कायद्याने बंधनकारक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे एकरकमी एफआरपीसाठी आग्रही असून त्यांनी आंदोलन करत कऱ्हाड ही आंदोलनाची रणभूमी करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, साखर कारखान्यांपुढेही आर्थिक पेच आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक आहे. साखर निर्यातबंदी असल्याने साखरेला उठाव नाही. परिणामी, साखर कारखांन्यापुढे साखरेचा दर आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपीचा ताळमेळ घालणे कठीण बनले आहे. 

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. सहकारी तत्त्वावर असलेल्या साखर कारखान्यांवर शासनाचे नियंत्रण असल्याने हे सहकारी साखर कारखान्यांना 100 टक्के शासनाच्या नियमाचे पालन करून 14 दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. गेल्या तीन वर्षांपासून साखरेला अपेक्षित उठाव नाही. त्यातच शासनाकडून निर्यातबंदी केली जात आहे. त्यामुळेही साखर परदेशात जात नाही. परिणामी, साखर शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या सहकारी साखर कारखान्यांकडे तीन वर्षांपासूनची साखर शिल्लक आहे. त्यातच मध्यंतरी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे उद्योगधंदे बंद राहिले. त्याचा मोठा फटका साखर कारखान्यांनाही बसला. 

बाजारपेठेत साखरेचे दर 3,100 ते 3,200 च्या दरम्यान आहेत. त्यातच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने एफआरपीची रक्कमही वाढली आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना उताऱ्यानुसार 2,800 ते 2,900 रुपये एफआरपी द्यावी लागेल. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे ताळमेळ घालण्याचा पेच निर्माण झाला आहे. त्यातच राजू शेट्टी यांनी कालच सातारा येथे आंदोलन करत सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यास हातात उसाचे दांडके घेऊन कऱ्हाड ही आंदोलनाची रणभूमी असेल, असा इशारा दिला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी एफआरपी दिली आहे, मग साताऱ्यातून का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपीचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. 

बैठकीतील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष 
सातारा जिल्ह्यातील अपवाद वगळता अन्य साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जारी केलेली नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पाच डिसेंबरला बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये काय तोडगा निघणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com