गोंदवले : जुन्या काळात गोशा पद्धतीचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या राणंदकरांनी महिलांना आदराचे स्थान देत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय आज एकमताने घेतला. खण नारळाने ओटी भरुन मानाची साडी,हिरवा चुडा हाती पाहून महिलांसह उपस्थितही भावनिक झाले होते.ही प्रथा बंद करून वाईट चालीरितीला थारा न देणारे तालुक्यातील किरकसाल व बिदाल नंतरचे तिसरे गाव ठरले आहे. राजकीय,सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या नावाजलेले राणंद गाव.गावाच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहिले आहेत.शासकीय उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात सर्व मतभेद बाजूला सारून गावाने अनेकदा एकी दाखवून दिली आहे.सध्याही विधवांना समाजात मनाचे स्थान मिळावे म्हणून शासनाने पुढाकार घेतला आहे.
या माध्यमातून विधवाप्रथा बंद करण्यासाठी गावोगावी प्रयत्न सुरू आहेत.माण तालुक्यात किरकसाल गाव पाहिले विधवा प्रथामुक्त होताच बिदालकरांनीही गाव विधवा प्रथामुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.बिदालच्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पांजली मगर यांनी राणंद गाव देखील विधवा प्रथामुक्त करण्याचा निश्चय केला आणि कामाला लागल्या. पहिल्या टप्प्यात गेल्या आठवड्यात याबाबत महिलांची ग्रामसभा घेण्यात आली.यामध्ये झालेल्या चर्चेत महिलांकडून सकारात्मकता दिसून येताच गावकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले.आज ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा मनोहर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.त्यावेळी पुष्पांजली मगर यांनी विधवांना होणारा अन्याय व त्रास याबाबत विचार उपस्थितांपुढे मांडले.विधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याबाबत आवाहन करताच सर्वांनी हात वर करून विधवाप्रथा बंद करण्याला संमती दर्शवली.
त्यानंतर उपस्थित विधवा महिलांना हळदी कुंकू लावून खण नारळाने ओटी भरण्यात आली. तसेच हिरवी साडी आणि हिरवा चुडाही भरण्यात आला.पती निधनानंतर पहिल्यांदाच मिळालेल्या या सन्मानाने महिला गहिवरून गेल्या होत्या.या भावनिक वातावरणाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही पणावल्या. तालुक्यातील तिसरे विधवा प्रथामुक्त गाव म्हणून राणंदने मान मिळविला.यावेळी तब्बल तेरा महिलांना सन्मानित करण्यात आले.यावेळी उपसरपंच प्रसाद शिंदे,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,महिला, बचत गट,मानवाधिकार आयोगचे प्रतिनिधी, अंगणवाडी व आशा सेविका ग्रामसेवक नंदकुमार फडतरे व ग्रामस्थ उपस्थित होते.गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,विस्तार अधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. विधवा महिलांना न्याय देण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून यश मिळाले असून राणंद गाव विधवा प्रथामुक्त झाल्याचा अभिमान वाटतो.-सौ पुष्पा मनोहर चव्हाण,सरपंच,राणंद (ता.माण)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.