योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने होणार जप्त!

योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने होणार जप्त!

कऱ्हाड (जि. सातारा) : वाहन वापरण्यासाठीचे योग्यता प्रमाणपत्र नाही किंवा योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले आहे, तरीही ती रस्त्यावर चालवण्यासाठी आणल्या जाणाऱ्या वाहनांवर आणि योग्यता प्रमाणपत्र आहे; परंतु वाहन सुस्थितीमध्ये नाही, अशा वाहनांची आता प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. नऊ नोव्हेंबरपर्यंत ही विशेष मोहीम सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या दुचाकीसह सर्वच वाहने जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 

वाहनांना रस्त्यावर चालण्याठी फिटनेस सर्टिफिकेट म्हणजेच योग्यता प्रमाणपत्र परिवहन विभागाने लागू केले आहे. जे वाहन सुस्थितीत आहे, त्याची तपासणी करून आरटीओ कार्यालयाकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येते. त्यानंतर ते वाहन रस्त्यावर चालवण्यास योग्य आहे, असे ठरवले जाते. मात्र, ज्या वाहनधारकांकडे योग्यता प्रमाणपत्र नाही किंवा योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेले आहे, तरीही ती वाहने रस्त्यांवर धावत आहेत, त्यांच्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा वाहनांमुळे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यात यंदा सुमारे आठ हजार रस्ते अपघातात सुमारे तीन हजारांवर व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. त्याचा विचार करून परिवहन विभागाने आता अशा योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात नऊ नोव्हेंबरपर्यंत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.

कोरोनामुळे मध्यंतरी करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात राज्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आल्याचे आरटीओच्या पाहणीत समोर आले आहे. मात्र, त्यानंतरही ती योग्यता प्रमाणपत्रे नसलेली वाहने रस्त्यांवर आणली जात असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांचा धोका विचारात घेऊन आता ही राबवण्यात येणार आहे. कोरोनामुळे मध्यंतरी लॉकडाउन करावा लागला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूकही बंद करावी लागली होती. त्यामुळे वाहने बराच काळ एका जागेवर उभी राहिली. त्यातच जोरदार झालेल्या पावसाच्या पाण्यानेही वाहने खराब झाली आहेत. मात्र, तरीही ती वाहने रस्त्यावर आणली गेली आहेत. मात्र, त्यातील काही वाहनधारकांकडे योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात वाढण्याची शक्‍यता विचारात घेऊन अशा वाहनांवर कारवाईचा बडगा आरटीओकडून उगारला जाणार आहे. त्याअंतर्गत ज्यांच्याकडे योग्यता प्रमाणपत्र नाही अशा वाहनांची आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. राज्यभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जी वाहने सुस्थितीत नाहीत, ज्याच्याकडे योग्यता प्रमाणपत्र नाही, अशी वाहने जप्त केली जाणार आहेत. 

वाहनांची नोंदणीच होणार रद्द 
काही वाहनधारकांकडे योग्यता प्रमाणपत्र आहे. मात्र, ती वाहने रस्त्यावर चालवल्यास अपघात होऊन धोका होऊ शकतो, असे निदर्शनास आल्यास आटीओ अधिकाऱ्यांकडून अशी धोकादायक स्थितीतील वाहने पहिल्यांदा जप्त केली जातील. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार अधिकारी वाहनांची सद्यःस्थिती पाहून त्या वाहनांची नोंदणीच रद्द करण्यासाठीचीही कार्यवाही करणार आहेत. 

परिवहन विभागाच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात योग्यता प्रमाणपत्र नसलेली मात्र रस्त्यावर आणलेल्या वाहनांची तपासणी केली जाईल. नऊ नोव्हेंबरपर्यंत वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जप्त केली जातील. वाहनाधारकांनी आवश्‍यक ती काळजी घ्यावी. 
-संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com