बंद ग्रंथालयांमुळे वाचन चळवळीला ब्रेक!, जिल्ह्यात 470 ग्रंथालये उघडण्याच्या प्रतीक्षेत

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा)  : कोरोना संसर्गाचा वाचन चळवळीलाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात बंद असणारी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालये अद्यापही कुलूपबंद आहेत. त्यामुळे कांदबऱ्या, कथा, कवितासंग्रह आदी विविध साहित्य प्रकारांतील पुस्तके, ग्रंथांची होणारी देवाण-घेवाण पूर्णत: बंद आहे. त्याचा वाचन चळवळीवर अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आज नवीन पिढी डिजिटलकडे वळलेली असली तरी ज्येष्ठ व मध्यमवयीन लोकांना आजही वाचनासाठी हाती पुस्तक हवे असते. त्यामुळे बंद ग्रंथालयांमुळे वाचन संस्कृतीला ब्रेक लागल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यात 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. मात्र, सध्या त्यात शिथिलता मिळाल्याने जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, प्रवासाच्या हिस्ट्रीमुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रवासी हिस्ट्रीसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही बाधितांमध्ये समावेश दिसतो आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सातत्याने हात धुणे आदी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे बनले आहे.

लॉकडाउनपूर्वीच सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तकांची देवाण-घेवाण करण्यास निर्बंध आणले आहेत. पुस्तकांच्या हाताळण्यातूनही कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सार्वजनिक ग्रंथालये बंद आहेत. शासनाचा तसा आदेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे वाचकांचीही मोठी गैरसोय होत आहे. डिजिटलच्या युगात मोबाईल, संगणकावर पुस्तके उपलब्ध असली तरी अलीकडची पिढी वगळता मध्यमवयीन व ज्येष्ठांना आजही पुस्तक हाती 
घेऊन वाचनाची सवय कायम आहे. त्यामुळे त्यांचा कल डिजिटलकडे कमी दिसतो. शासनाच्या ग्रंथालये सुरू न करण्याच्या धोरणामुळे लोकांतील वाचनाचा कल कमी होण्याची भीतीही व्यक्त होताना दिसत आहे. 

जिल्ह्यात 398 अनुदानित तर सुमारे 70 विनाअनुदानित ग्रंथालये आहेत. शासनाच्या निर्णयामुळे ही सर्व बंद आहेत. वाचनालये उघडायलाच परवानगी नसल्याने एखाद्या वाचकाने मागणी करूनही पुस्तक देता येत नसल्याची ग्रंथालयांची परिस्थिती आहे. शहरापासून अगदी ग्रामीण भागातही ही ग्रंथालय चळवळ वाचन संस्कृती रुजविण्याचे काम करते. मात्र, कोरोनामुळे वाचन संस्कृतीलाच ब्रेक लागत असल्याची भीती व्यक्त होत आहे. 


""कोरोनाने गेल्या चार महिन्यांपासून ग्रंथालये बंद आहेत. त्यामुळे लोकांचा वाचनाकडे कल कमी झालेला आहे. सगळेच लोक डिजिटलचा वापर करतात असे नाही. अनेकांना पुस्तक वाचनाची सवय आहे. त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे शासनाने वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या अटींवर वाचकांना घरपोच पुस्तके देण्याची परवानगी द्यावी.'' 

-संजय पिसाळ, 
प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभाग, 
उपाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण कऱ्हाड तालुका ग्रंथालय संघ 

संपादन : पांडुरंग बर्गे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com