संभाव्य तोटा ग्रहित धरून बॅंकांनी काटकसर करावी, यांनी दिलेत आदेश

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्या काळात बॅंकांच्या उत्पन्न क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे बॅंकिंग क्षेत्राला संभाव्य तोटा होणार असल्याचे गृहित धरून बॅंकांनी त्यांच्या भांडवलाच्या जपणुकीसह व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी काटकसरीचे धोरण अवलंबवावे, अशा सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिल्या आहेत. परिणामी आता बॅंकांना या सूचनांचे पालन करत विनाकारण होणारा खर्च टाळण्यासह खर्चातही कपातीचे धोरण अवलंबवावे लागणार आहे. 

कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने लाभांश वितरण करू नये, अशी बॅंकांना बंदी घातली आहे. त्याचा निर्णय आर्थिक स्थितीवर घेण्यात येणार आहे. वसुलीस पात्र असलेल्या कर्ज हप्त्यांना मुदतवाढ द्यावी. शासनानेही सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या संचालक मंडळास तसेच निवडणुकीस मुदतवाढ दिली आहे. बॅंकांच्या आर्थिक व्यवसायामध्ये टाळेबंदीमुळे घट झालेली आहे. अशा आर्थिक अनिश्‍चिततेच्या स्थितीत संभाव्य तोटा सहन करण्यासाठी बॅंकांनी भांडवलाची जपणूक करण्याची गरज आहे, असेही त्यात सुचविले आहे.

रिझर्व्ह बॅंकेने कर्जवसुलीस मुदतवाढ दिलेली असल्याने बॅंकांकडील येणे कर्ज व त्यावरील व्याजाची वसुली काही कालावधीनंतर होणार आहे. बॅंकांना कर्जावरील व्याजापासून मिळणारे उत्पन्न प्राप्त परिस्थितीत कमी झाल्याने बॅंकांनी उत्पन्न क्षमता टिकविण्यासाठी खर्चात काटकसर करणे आवश्‍यक आहे. तसेच बॅंकांच्या संचालक मंडळांचा कालावधी संपुष्टात आलेला असल्याने व राज्य शासनाने संचालक मंडळ निवडणुकीस मुदतवाढ दिली असल्याने संचालक मंडळास मोठ्या स्वरूपाचा खर्च करता येणार नाही.

टाळेबंदीच्या कालावधीमध्ये व्यवसाय, उद्योग बंद आहेत. कामगारही स्थलांतरित झालेले आहेत. टाळेबंदीचा फटका शेती उद्योगास बसलेला आहे. टाळेबंदीच्या कालावधीत शेतमालाच्या विक्रीवर मर्यादा आल्या आहेत. टाळेबंदीचा प्रतिकूल परिणाम बॅंक व्यवसायावरही झाला आहे. बॅंक शाखांचे कामकाज किमान मनुष्यबळावर केवळ तातडीच्या अत्यावश्‍यक कामकाजासाठी करण्यात येत आहे. व्यवसाय, उद्योग बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल मंदावलेली आहे. त्यामुळे बॅंकांच्या उत्पन्न क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्या सगळ्यांचा विचार करून काटकसरीचे धोरण आखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी बॅंकांनी त्याचे धोरण आखावे. 

सहकारी बॅंकांनी सभा-समारंभ, जाहिरातीवरील खर्च, अनावश्‍यक कंत्राटी नोकरभरती, कार्यालय नूतनीकरण, फर्निचर दुरुस्ती व खरेदी, इमारत जागा, वाहन खरेदी, चहापान खर्च, वैयक्तिक स्वरूपाचा खर्च आदींवर मर्यादा आणाव्यात, असे सहकार आयुक्तांनी म्हटले आहे. 

""टाळेबंदीच्या कालावधीत शेतमालाच्या विक्रीवर मर्यादा आलेल्या आहेत. टाळेबंदीचा प्रतिकूल परिणाम बॅंक व्यवसायावरही झाला आहे. बॅंक शाखांचे कामकाज किमान मनुष्यबळावर केवळ तातडीच्या अत्यावश्‍यक कामकाजासाठी करण्यात येत आहे. व्यवसाय, उद्योग बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल मंदावलेली आहे. त्यामुळे बॅंकांच्या उत्पन्न क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.'' 

-अनिल कवडे, 
सहकार आयुक्त 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com