"बीएसएनएल'चे ग्राहक खासगी मोबाईल कंपन्यांच्या प्रेमात!, का ते वाचा

Satara
Satara

केळघर (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात भारतीय दूरसंचार निगम अर्थात "बीएसएनएल'च्या नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो ग्राहकांना बसत असून, दिवसेंदिवस सेवेत सुधारणा करण्याऐवजी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यास अपयशी ठरू लागल्याने आता ग्राहक खासगी कंपन्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. 

दूरसंचार विभागाचे खरे तर "अहर्निश सेवामहे' हे ब्रीदवाक्‍य आहे. याचा अर्थ ग्राहकांना नेहमी सर्वोत्तम सेवा देणे असा होतो. मात्र, सध्याच्या घडीला दूरसंचार विभाग सर्वोत्तम सोडा पण ग्राहकांना खासगी कंपन्यांकडे वळायला जाणीवपूर्वक भाग पाडत तर नाही ना, असा सवालही ग्राहक उपस्थित करत आहेत. दूरसंचार विभागाचे मेढा या तालुक्‍याच्या ठिकाणी सुसज्ज कार्यालय आहे. मात्र, बऱ्याच वेळा या कार्यालयाला बाहेरून कुलूप असते. एवढे मोठे कार्यालय असताना ते बंद का असते, याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे आवश्‍यक आहे. जावळी तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईला आहेत. त्यांचे संपर्काचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल आहे. मात्र, मोबाईलची वारंवार "रेंज' गायब होणे, इंटरनेट कनेक्‍शन चालू नसणे या कारणांमुळे चाकरमान्यांना आपल्या नातेवाईकांशी संवाद साधणे दुरापास्त होत आहे. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तालुक्‍यातील अभियंते काही ठिकाणी "वर्क फ्रॉम होम' करत आहेत. मात्र, दूरसंचारची सेवा समाधानकारक मिळत नसल्यामुळे त्यांच्या कामालाही "ब्रेक' मिळतो आहे. आठवड्यातून चार-चार दिवस "रेंज' येत नसल्याने बॅंकांची कामे ठप्प होत आहेत. विशेषतः केळघर विभागात तर दूरसंचारची रेंज गायब होणे आता नित्याचे झाले आहे. "रेंज' नसल्यामुळे बॅंक, पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार थांबत असल्याने याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य ग्राहक, पेन्शनरांना बसतो आहे.

सेवेच्या तक्रारीसाठी दूरसंचार विभागाच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. तसेच अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास हे अधिकारी फोन उचलत नाहीत. तर त्रस्त ग्राहकांनी नेमकी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न दूरसंचारच्या ग्राहकांना पडत आहे. "बीएसएनएल'च्या या सुस्त सेवेमुळे ग्राहक नाईलाजाने खासगी कंपन्यांकडे वळू लागलेले आहेत. याचे कसलेही सोयरसुतक या अधिकाऱ्यांना नाही. केळघर विभागात अगदी छोट्या खेड्यातही खासगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर आहेत. या खासगी कंपन्या ग्राहकांना "बीएसएनएल'च्या तुलनेने चांगली सेवा देत आहेत. 

अधिकाऱ्यांची उदासिनता 

दूरसंचार विभागाच्या सातारा कार्यालयातील सहायक उपप्रबंधक आर. एस. सूर्यवंशी यांच्याशी याबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मेढा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी याबद्दल माहिती देतील असे सांगितले. मात्र, मेढ्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

""जावळीसह महाबळेश्वर तालुक्‍यात "बीएसएनएल'ची सेवा असमाधानकारक असून, ग्राहकांनी मागणी करूनही लॅंडलाइन, इंटरनेट कनेक्‍शन मिळत नाही. या कारभारात सुधारणा व्हावी यासाठी महाबळेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही लेखी निवेदन दिले आहे.'' 

-गणेश उतेकर, शिवसेना संघटक, महाबळेश्वर तालुका 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com