सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या "कम्युनिटी ट्रान्समिशन'चे सावट

 सातारकरांनो सावध व्हा; कोरोनाच्या "कम्युनिटी ट्रान्समिशन'चे सावट

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, गेल्या महिन्यामध्ये तब्बल 843 रुग्णांची भर पडली आहे. त्यातच नुकत्याच आढळलेल्या काही रुग्णांबाबतीत संसर्ग नेमका कोणामुळे व कशामुळे झाला हे पुरेसे स्पष्ट होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून येणारे नागरिक, होम क्वारंटाइनचे पालन व गर्दीवरील नियंत्रण या सर्वच पातळ्यांवरील उपाययोजनांचा व त्याच्या अंमलबजावणीचा जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. 

मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. लॉकडाउनच्या काळामध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग कमी होता. मार्च ते नऊ जून या कालावधीत जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 649 होती; परंतु लॉकडाउनच्या निर्बंधामध्ये शिथिलता आली. त्यामध्ये दुकाने व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली, तसेच जिल्ह्याअंतर्गत प्रवासालाही परवानगी मिळाली. या शिथिलतेमुळे प्रशासनाची जिल्ह्याच्या सीमांवर, तसेच गावातील ग्रामस्तरीय समित्यांच्या कामांतील पकडही कमी झाली. त्याने जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने घात केला. तीन महिन्यांपेक्षा जास्त कोरोना बाधितांची संख्या गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यात झाली आहे. नऊ जून ते नऊ जुलै या कालावधीमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 843 रुग्ण झाले आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांत केवळ 28 जणांचे मृत्यू झाले होते. या एकाच महिन्यात त्यात 33 ने वाढ झाली आहे. 

कोरोना रुग्ण व मृत्यूदर वाढ ही जिल्ह्यासाठी धोक्‍याची सूचना आहे. रुग्ण साडल्यानंतर दिल्या जाणाऱ्या कारणांमध्ये बहुतांश रुग्णांची प्रवासाची हिस्ट्री असल्याचे सांगितले जात आहे; परंतु कोरोना बाधित क्षेत्रांतून विशेषत: मुंबई-पुण्यातून
नागरिकांना येण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असताना बाहेरून नागरिक जिल्ह्यात येतात कसे हा प्रश्‍न आहे. बरे आले, तरी त्यांना योग्य सुविधा असलेल्या घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी क्वारंटाइन केले जात असल्याचे व त्यावर ग्रामस्तरीय समित्यांचे लक्ष असल्याचे सांगितले जाते. हे खरे असेल, तर प्रवासाची हिस्ट्री असणाऱ्यांच्या संपर्कातील बाधित समोर येतातच कसे, हाही मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या उपाययोजनांवर नागरिक आता प्रश्‍न उपस्थित करू लागले आहेत. 

या त्रुटींचा फटका आता जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरात विशेषतः 15 दिवसांत आढळलेल्या काही रुग्णांना बाधा कोणाकडून व कशी झाली याबाबत पुरेसे स्पष्ट करता येत नाही. त्यामुळे ते फिरत राहिले आणि त्यांच्यापासून अनेकांना बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य कर्मचारी जिल्ह्यात कोरोनाच्या "कम्युनिटी ट्रान्समिशन'ला सुरुवात झाली काय, अशी शंका उपस्थित करू लागले आहेत. जिल्ह्यात बाजारपेठा व अन्य ठिकाणच्या गर्दीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही. जिल्ह्यांतर्गत प्रवास सुरूच आहे. त्यामुळे "कम्युनिटी ट्रान्समिशन' झाल्याने बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांवर अंकुश, ग्रामस्तरीय समित्यांचे व त्यांच्या कारभाराचे सक्षमीकरण व गर्दीवर निर्बंध यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com