सातारा शहरात पोलिसांचा दरारा कमी

शुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीच्या घटना; सामाजिक शांततेला बाधा
Satara crime update city police social peace serious beatings cases
Satara crime update city police social peace serious beatings casesSakal

सातारा : शहर परिसरात गेल्या काही दिवसांत अगदी शुल्क कारणावरूनही गंभीर मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे जनतेमध्ये पोलिसांचा असलेला दरारा, धाक कमी झाल्याचे द्योतक आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढणे सामाजिक शांततेला नक्कीच बाधा आणू शकतात. त्याचा गांभीर्याने विचार करत अशा टोळक्यांवर जरब बसेल, असे पोलिसिंग राबविण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे.

सामाजिक शांतता अबाधित राखणे हे पोलिसांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यासाठी कठोर पावलांबरोबरच सातत्यपूर्ण जनसंपर्क व जनतेच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा कार्यरत असावी लागते; परंतु गेल्या काही दिवसांत शहर परिसरात घडलेल्या विविध घटना सुरक्षिततेच्या वातावरणाला छेद देणाऱ्या ठरत आहेत. रस्त्यातून बाजूला व्हा म्हटल्याची किंमत आपला डोळा गमावून चुकवावी लागत असेल, तर याहून भयावह वातावरण कशाला म्हणायचे. मोनार्क चौकात एका वकिलावर झालेल्या या हल्ल्यामुळे साताऱ्यातील जनमानस विचलित झाले. त्यानंतर किमान दररोज अशा प्रकारचे एक, दोन गुन्हे शहर किंवा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. त्यानंतरही जुन्या भांडणाच्या कारणातून मांढरे आळीत झालेली मारहाण, चायनीज चालकाला डोक्यात बाटली फोडून गंभीर जखमी करणे, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण, जीप चालकाला वर्दळीच्या ठिकाणी अडवून झालेली मारहाण अशा विविध घटना शहरातील सामाजिक स्वास्थ्याबाबत धोक्याची घंटा देणाऱ्या ठरत आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यामुळे समोर आले; परंतु शहरातील गल्लीबोळातील टोळक्यांकडून विविध प्रकारच्या त्रासाला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांच्या शहरातून होणाऱ्या गस्ती काय परिणाम साधतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस करतात काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

किरकोळ तक्रारींचाही गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे, तरच कसेही वागा, आपले कोण काय करणार अशी युवा वर्गाची मानसिकता बदलू शकते. त्यांच्यातील बेदरकारपणाला लगाम घातला जाऊ शकतो. ते शहरामध्ये सध्या होताना दिसत नाही. शहरातील हे वातावरण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढू शकते. तेव्हा ती पोलिसांचीच डोकेदुखी वाढवतील. त्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

नेटवर्क आणखी घट्ट करावे लागणार

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगले काम करत आहेत. त्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून वारंवार निर्देशही दिले जातात; परंतु त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्यातील अभाव, नको त्या घटनांना प्रोत्साहन देणाऱ्या ठरत आहेत. पोलिसांच्या कारवायांबरोबरच अस्तित्वाच्या जाणिवेतून अशांतता माजविणाऱ्यांवर जरब असेल तरच या घटना टाळल्या जाऊ शकतात. याचे भान शहरातील दोन्ही पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांचे शहरातील नेटवर्क आणखी घट्ट करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com