
तारळे (जि. सातारा) : आधीच कोरोना विषाणूने हतबल केलेले असताना परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. चार दिवस अचानक झालेल्या जोरदार पावसाने तारळे भागातील विहीर व शेतीचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होऊन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
ऑगस्टमधील संततधार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली होती. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. भाद्रपदाचे ऊन तापू लागल्याने महिन्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. सलग चार दिवस मुसळधार पाऊस बरसला. विशेषतः रविवारी झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
तारळे विभागातील शेती पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस व अन्य पिके धोक्यात आली. सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसाने पाणीच पाणी केले होते. ओढे, नाले दुथडी भरून वाहिले. अनेक ओढे, ओहळ भरून गेल्याने शेतातील पीक झोपवून टाकले. यामुळे विभागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे शेतात हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने कंबरडे मोडले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे प्रत्यक्ष बांधावर येऊन पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तारळे मंडलात महसूल विभागाने नुकसान पाहणी करून पंचनामे केले आहेत. आवर्डे मंडलाची माहिती मिळू शकली नाही.
""परतीच्या पावसाने विहीर, मोटार व शेतीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे केले आहेत. मात्र, तत्पर मदत मिळाली पाहिजे.''
- संदीप पाटणकर,
प्रगशील शेतकरी, आंबळे
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.