आता भात लावणी करायची तरी कशी?

jawali
jawali

केळघर (जि. सातारा) : ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने परिसरातील भातलावणी अडचणीत आली असून पावसाळ्यात कडक ऊन पडत असल्याने भाताचे तरवे पाण्याअभावी कोरडे पडू लागल्याने भातलावणी खोळंबली आहे. 

या परिसरात भातलागण अंतिम टप्प्यात आली असतानाच गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लागणीस विलंब होत आहे. भात लागणीच्या वेळेस पावसाची आवश्‍यकता असते. मात्र, पावसाने उसंत घेतल्याने त्याचा परिणाम लागणीवर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी कशी तरी लावणी उरकून घेतली आहे. मात्र, कोरडवाहू जमिनींना पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अगोदरच महागडे बियाणे, खते घेऊन शेतकऱ्यांनी तरवे पेरणी केली होती. त्यातच लॉकडाउनमुळेही पेरणीस उशीर झाला होता. जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली असून समाधानकारक पाऊस न पडल्याने ज्या भात पिकावर शेतकऱ्यांची वर्षभर गुजराण होते, तेच पीक पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे संकटात सापडले आहे.
 
ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना इंजिन लावून भाताची लागण करावी लागत असून पाऊस लांबल्यास त्याचा फटका तरव्यांना बसून तरवे पिवळे पडून भाताच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुळातच भात हे पीक पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असल्याने यंदा भात पिकाचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 


भाताच्या लावणीसाठी पावसाची आवश्‍यकता असते. मात्र, पावसाची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांना पाणी विकत घेऊन लागण करावी लागत आहे. 

- नारायण बेलोशे, प्रगतशील शेतकरी, केळघर 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com