सातारा : कोरेगावला वीज कंपनीचा ‘शॉक’

खंडित विजेमुळे आसरे, कुमठ्यातील पिके वाया जाणार
 शॉक
शॉकsakal

पळशी: वडाचीवाडी येथील उपकेंद्रातून ‘खेड एजी’च्या फिडरद्वारे पुरवली जाणारी वीज वर्षभरापासून सलगपणे दोन तास पण धड मिळत नाही. त्यातच आता ‘फोर्स लोड शेडिंग’च्या नावाखाली आणखी वीजपुरवठा खंडित केला जाऊ लागल्याने कोरेगावच्या निम्म्या शिवारासह आसरे, कुमठे येथील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा जबर ‘शॉक’ बसू लागला आहे. परिणामी पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी ते शेतीला पुरेशा प्रमाणात देता येत नसल्यामुळे पिके वाळून जाण्याच्या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येबाबतची माहिती देताना पृथ्वीराज बर्गे यांनी सांगितले, की वडाचीवाडी येथील उपकेंद्रातून प्रामुख्याने ‘खेड एजी’, वडाचीवाडी-शेंदूरजणे एजी, कॅनॉल एजी, अशा तीन फिडरद्वारे परिसरातील शेतीच्या उपसापंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. यापैकी ‘खेड एजी’वर कोरेगावचे निम्मे शिवार, आसरे आणि कुमठे या गावांतील शेतकरी अवलंबून आहेत. धोमच्या कालव्याच्या आवर्तनादरम्यान कॅनॉल फिडर सुरू होताच खेड एजीच्या फिडरला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. गेले वर्ष-दीड वर्ष ही समस्या कायम आहे. त्यावर एकआड एक दिवस फिडर सुरू ठेवण्याचा तोडगा काढला. तरीही पुरेशा प्रमाणात सलगपणे वीज उपलब्ध होत नाही.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उपसापंप सुरू करण्यासाठी येरझाऱ्या घालाव्या लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांनी उपसापंपाच्या मोटरला ‘अॅटो स्विच’ बसवले आहेत; परंतु विजेच्या कमी-अधिक दाबामुळे अॅटो स्विच जळून जात आहेत. एका सरीमध्ये पाणी सोडल्यानंतर ते थोडे पुढे गेले, की वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर आधी भिजलेल्या सरीतूनच पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. कॅनॉल फिडरवर अवलंबून असलेले उपसापंप कालव्याचे आवर्तन संपेपर्यंत अव्याहतपणे सुरू राहतात. त्यामुळे इतर फिडरला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. हा मुद्दा पुढे आणला, की राजकीय हस्तक्षेप सुरू होतो. वडाचीवाडी येथील उपकेंद्रात आणखी एक फिडर बसवल्यास हा प्रश्न सुटू शकेल. त्याविषयीची कार्यवाही सुरू असल्याचे मोघमपणे सांगून बोळवण केली जाते; परंतु तशा हालचाली मात्र दिसत नाहीत. लोकप्रतिनिधीही गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पिके जळून गेल्यावर राजकीय लोक जागे होणार आणि ओरड सुरू करणार. पण, समस्येच्या मुळाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे श्री. बर्गे यांनी सांगितले.

गेले वर्षभरापासून वडाचीवाडी येथील फिडरमधून येणाऱ्या ‘खेड एजी’ची वीज दोन तास पण धड मिळत नाही. अनेकदा तक्रारी करूनही वीज मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास काही दिवसांनी पिके जळून जातील.

- पृथ्वीराज बर्गे, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे कोरेगाव तालुकाध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com