कऱ्हाड - शहीद जवान आणि आजी माजी सैनिकांच्या कुटूंबीय यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलो. त्यांच्याडुनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यांना देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही.
त्यामुळेच आता शहीद जवानांचे कुटूंबीय, आजी - माजी सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हा माजी सैनिक फेडरेशनच्या माध्यमातुन मी सातारा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांना आज जाहीर केले.
सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत श्री. कदम बोलत होते. तालुकाध्यक्ष सदाशिव नागणे, चंद्रकांत साठे, राजकुमार शिंदे, निवृत्त सुभेदार राजाराम माळी, शहीद वीर पुत्र सुरज जगताप, मनोज चव्हाण, सुरेश शेवाळे, सचीन माने, महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा स्वाती बोराटे यांच्या फेडरेशनचे पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यातील आजी - माजी सैनिकांसह शहीद जवानांच्या कुटूंबियांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन कार्यरत आहे. या फेडरेशनच्या माध्यमातून आजवर सातारा जिल्ह्यातील सैनिकांसह त्यांच्या कुटूंबियांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर अनेकदा हेलपाटे मारले आहेत.
सैनिक फेडरेशनने त्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन प्रलंबित मागण्या, अनेक वर्षाचे प्रश्न मार्गी लावण्याची आम्ही मागणी केली. मात्र देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही.
मागील तीन ते चार दशकांपासून माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटूंबीय शासन दरबारी हेलपाटे मारत आहेत. आजवर आजी - माजी सैनिकांसह त्यांच्या कुटूबियांनी कोणत्या ना कोणत्या पक्षाला मतदान केले, मात्र सर्वच पक्षांनी देशासाठी लढणार्या सैनिकांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आता स्वतःच्या समस्या, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक फेडरेशनने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.