टोमॅटोनं तारलं, कांद्यानं रडवलं अन्‌ लॉकडाउननं मारलं!

Satara
Satara
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या कठीण काळात अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आई भिक मागू देईना, बाप मरू देईना अशी अवस्था परिस्थिती व प्रशासनाने शेतकऱ्यांची केली आहे. 

माण तालुक्‍यातील शेतकरी नेहमीच निसर्गाशी दोन हात करत आपली शेती करतो. नेहमीचा दुष्काळ तर कधीतरी होणारी अतिवृष्टी इथल्या शेतकऱ्यांची परीक्षा पाहात असते. अशा परिस्थितीतही शेतकरी विविध प्रयोग करत शेती पिकवतो. मात्र, बहुतांशी वेळा या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातो. 

कष्ट व भांडवल जास्त; पण दर मिळाला तर कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून माणमधील शेतकरी टोमॅटो या पिकाकडे वळला आहे. यावर्षी टोमॅटो बागायतदारांना कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरात अनेकदा चढउतार राहिला, तर कधी- कधी वाहतुकीची समस्या सुद्धा निर्माण झाली. मात्र, असे असले तरी यावर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना तारल्याचे चित्र आहे. 

माणमधील सर्वात जास्त घेतले जाणारे नगदी पीक म्हणजे कांदा. गरवा असो वा हळवा दोन्ही कांदा माणमध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो. सात ते आठ महिन्यांपूर्वी तब्बल 20 हजार रुपये क्विंटल असा उच्चांकी दर कांद्याने गाठलेला होता. मात्र, त्या वेळी कांद्याचे खूप कमी उत्पादन होते. त्यानंतर कांदा लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली. कांद्याचे उत्पादन वाढले अन्‌ दर गडगडले. कांद्याचा दर क्विंटलला हजार रुपयांच्या आसपास आहे. आता कांद्याला फक्त 700 ते 800 असा क्विंटलला दर आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.

मजुरीपासून खतांपर्यंत सर्वच दर वाढले असल्यामुळे उत्पादन खर्चच 800 ते हजार रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे हा दर कांदा मातीमोल भावाने विकण्यासारखा आहे. त्यातच बिदालसारख्या गावात तब्बल 60 हजार थैली कांदा ऐरणीत होता. आता त्यातील 20 हजार थैली कांदा शिल्लक आहे, तर साधारण अडीचशे एकरांवर कांद्याची लागण झालेली आहे. हे सर्व शेतकरी कांद्याचा दर वाढेल अशी अपेक्षा करत आहेत. मात्र, सर्वच परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे सध्या तरी कांद्याच्या दरात वाढ होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मोठी अपेक्षा असलेला कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. 
या सर्व बिकट परिस्थितीत वारंवार होत असलेला लॉकडाउन शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. प्रतिकूल निसर्गावर मात करत पीक घेतलं व मिळेल त्या दरात विक्री केली तर कसेबसे चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहेत. मात्र, लॉकडाउन जाहीर झाला, की बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतीमाल जाग्यावरच पडून राहात आहे. अनेकदा तो सडून जात असल्यामुळे त्या खराब झालेल्या शेतीमालाकडे हताशपणे बघण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरत नाही. एकूणच लॉकडाउन हा शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. 

""चांगला पैसा देणारे पीक म्हणून आम्ही कांद्याकडे बघतो. मात्र, दोन वर्षे झाले दर नसल्याने कांदा पिकवायला जेवढा खर्च येतोय तेवढे पण उत्पन्न मिळेनासे झाले आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. निर्यात मोठ्या प्रमाणात झाली, तर दर चांगला मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.'' 
- बापूराव जगदाळे, कांदा बागायतदार, बिदाल 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Maharashtra Schools Get New Drug Prevention Plan as Management Committees Take Responsibility for Student Safety
Eknath Shinde Arrives at Dare Village
Marathi News Esakal
www.esakal.com