निष्ठावंतांना न्याय, गद्दारांना धडा शिकवू : मंत्री सामंत साताऱ्यात गरजले

निष्ठावंतांना न्याय, गद्दारांना धडा शिकवू : मंत्री सामंत साताऱ्यात गरजले

सातारा : कोल्हापूरसह राज्यातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अनेकांनी निवडणुकीच्या काळात गद्दारी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर देऊन धडा शिकवावा. सातारा जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी असे काम करावे की त्याची दखल इतर पक्षांनी घ्यावी, अशा सूचना उच्च, तंत्र शिक्षणमंत्री व जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत आज (ता. १) दिल्या. जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून माझी निवड झाली. त्याची प्रचिती अवघ्या तीन महिन्यात कामातून दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सातारा येथील हॉटेल प्रीति येथील नरिमन हॉलमध्ये झालेल्या या बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, सदाभाऊ सपकाळ, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, महिला प्रमुख शारदा जाधव, अनिता जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, एस. एस. पार्टे, अजित यादव, प्रताप जाधव हे उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कोणाचीही शिफारस गरजेची नाही. शिवसेना वाढवण्यासाठी गावागावात शाखा असणे गरजेचे आहे. जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे. माझ्या नियुक्तीमुळे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना त्रास होणार नाही, हे नक्की. संघटनेच्या भल्यासाठीच मी रत्नागिरीतून साताऱ्यात आलो आहे. माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खाते असल्याने त्याचा फायदा युवा सेनेने जिल्हयातील युवकांपर्यंत पोहचविला पाहिजे. लवकरच जिल्हा प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक लावून विकासाच्या दृष्टीने चर्चा करू. 

मंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी काम सुरु आहे. एका दिवसात तब्बल 448 गावात शिवसेना शाखा सुरु करण्यात आल्या. मी अर्धा मंत्री आहे, तर श्री. सामंत हे पूर्ण मंत्री आहेत. त्यामुळे मी रेटून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. बानुगडे पाटील म्हणाले, सातारा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जात आहे. जिल्ह्याच्या एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे सुकाळ आहे. मनोहर जोशी मंत्री असताना जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कृष्णा खोऱ्याची निर्मिती केली असल्याने आता दुष्काळी भागात पाणी पोहचले आहे. पुणे-बंगलोर महामार्गाची निर्मिती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सहकार क्षेत्रात शिरकाव करावा. जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवावा. 

महेश शिंदे म्हणाले, राजकारण राजकारणासाठीच असते, महाविकास आघाडीत प्रत्येकजण आपला पक्ष वाढवत आहे. दोन महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका आल्या असल्याने आता ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची आहे. गावात एकजण कार्यकर्ता असला तरी त्याने पॅनेल टाकणे गरजेचे आहे. राजकारणात यशस्वी होण्याचे असेल तर पहिली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक यशवंत घाटगे यांनी, तर आभार शारदा जाधव यांनी मानले. 

शेखर गोरेंना निमंत्रणच नाही 
माण-खटाव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा लढलेले शेखर गोरे यांना आजच्या बैठकीचे निमंत्रणच दिलेले नव्हते. याबाबत पत्रकारांनी श्री. सामंत यांना विचारले असता त्यांनी काही त्रुटी राहिल्या असतील काही ठिकाणी मतभेद असतीलही ते निवांतपणे सोडविले जातील. सर्वजण शिवसैनिक म्हणून आगामी काळात काम करतील. सर्वांचा समन्वय आगामी काळात राखला जाईल, असे त्यांनी सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com