वळसे-कागल महामार्गाचे टेंडर दिवाळीनंतर; खासदारांनी उठविला लोकसभेत आवाज

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : वळसे ते कागल सहापदरीकरणाच्या कामाची पुन्हा टेंडर प्रक्रिया होणार आहे. मागील वेळी केलेली टेंडर प्रक्रिया मागे घेण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी महामार्गावर काही ठिकाणी पुराचे पाणी आले होते. त्यामुळे महामार्ग बंद ठेवावा लागलेला होता. त्यामुळे अशा ठिकाणी पुलांची उंची वाढविणे, सखल भागातील महामार्ग उचलून घेणे, नव्याने जागा संपादनास विरोध आदी कारणांमुळे आराखड्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या सहापदरीकरणाची टेंडर प्रक्रिया दिवाळीनंतरच होणार आहे. 

पुणे-सातारा या महामार्गाचे सहपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण, अजूनही त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यावरून नागरिकांनी टोल का भरावा, असा प्रश्‍न जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित करून टोलविरोधात भूमिका घेतली आहे. पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील टोलनाक्‍यांवर एमएच 11 व एमएच 50 या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. पण, नव्याने होणाऱ्या महामार्गावरील टोलचे काय होणार, हा प्रश्‍न बाकी आहे. वळसे ते कागल या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेत अडकले आहे. मागील वेळी सुमारे 1200 कोटींच्या या कामाची टेंडर निघाली. पण, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. तर दोन-तीन वर्षांपूर्वी पुरामुळे महामार्गावरील पूल पाण्याखाली गेले. पर्यायाने आठवडाभर महामार्ग बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या आराखड्यात एनएचआयने बदल करण्याचा निर्णय घेतला. 

सखल भागातील महामार्ग उचलून घेणे तसेच पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची उंची आणखी वाढविणे याबाबतचा समावेश केला. त्यामुळे मूळच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता हा बदल करून केलेल्या आराखड्यानुसार नव्याने टेंडर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे मूळच्या 1200 कोटींच्या बजेटमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे साधारण दिवाळीच्या दरम्यान वळसे ते कागल या मार्गाच्या सहापदरीकरणाची टेंडर प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर साधारण वर्षभरात हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये संपूर्ण सेवारस्ते तयार करणे, पुलांची उंची वाढविणे, सखल भागातील महामार्ग उचलून घेणे, काही ठिकाणी पूल अरुंद आहेत, ते नव्याने सहापदरी रस्ता होईल असे बांधणे आदींचा यामध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभराचा कालावधी वळसे ते कागल रस्त्याच्या टेंडर प्रक्रियेतच जाणार आहे. 

महामार्गाच्या विविध प्रश्‍नांवर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत आवाज उठविला आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाची अपूर्ण कामे तातडीने करण्यासोबतच वळसे ते कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे कामही लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. पण, गेल्या तीन ते चार वर्षांपासून या मार्गाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने हे काम मार्गी लागलेले नाही. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com