शाळांच्या सुरक्षिततेसाठी आता समिती, आपत्तीत धोका टाळण्यासाठी निर्णय

Satara
Satara
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा)  : आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आता शाळांच्या सुरक्षेसाठी शालेय सुरक्षा सल्लागार समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पुरादरम्यान व कोणत्याही आपत्तीत शाळेच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना कराव्यात, याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांमार्फत शालेय विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सध्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. 

आपत्ती ही कधी सांगून येत नाही. त्यामुळे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वच यंत्रणा जागृत असाव्यात, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाते. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला पुरापासून संरक्षणासाठीच्या उपाययोजना, प्रात्यक्षिके घेतली जातात. त्याचबरोबर आपत्तीचा सामना करण्यासाठी "एनडीआरएफ'च्या तुकड्यांना पाचारण करावे लागते. त्याव्दारे लोकांना मदत करण्याची कार्यवाही केली जाते. अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. ही एक बाजू आहे. मात्र, आपत्ती आल्यानंतर घाबरून न जाता शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी काय उपाययोजना कराव्यात, त्यातून कसे सहीसलामत बाहेर पडावे, यासाठी शासनपातळीवर एक आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

त्याअंतर्गत शाळांच्या सुरक्षेसाठी आता शालेय सुरक्षा सल्लागार समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षण परिषदेचे कार्यकारी अभियंता हे सदस्य असणार आहेत. त्यांच्या समितीमार्फत जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसाठीचा एक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या आराखड्याची अंमलबजावणी नेमकी कशी करायची, याचीही जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे. त्याबरोबर आपत्ती आल्यानंतर त्याचा मुकाबला करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी आता शिक्षक आणि विद्यार्थी यांनाही आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील मॉकड्रीलचेही आयोजन करण्यात येणार आहे. आपत्ती आल्यानंतर एखाद्यास जिवास मुकावे लागू नये, यासाठीची कार्यवाही केली जाणार आहे. त्याची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे. 

उपायांच्या अंमलबजावणीसाठी बैठका 

सुरक्षा सल्लागार समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात तालुकानिहाय बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये शाळा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करायच्या उपाययोजनांची माहिती शिक्षकांना दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित उपाययोजनांची प्रत्येक शाळेत अंमलबजावणी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com