विरोध पक्ष नेते म्हणाले... "ह्यांना' हुकी आली आणि सातारा झाला लॉकडाउन

koregaon
koregaon

सातारा : कोरोना संसर्गाच्या काळात राज्य सरकारप्रमाणेच जिल्हा प्रशासनही गांभीर्याने वागत नाही. प्रशासन एककल्ली कारभार करत असून, आयुक्त व जिल्हाधिकारी मनमानी करत आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव आहे. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. साताऱ्यात जनतेचे राज्य नसून सर्व नोकरशाही राज्य चालवत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी व कऱ्हाडच्या कॉटेज हॉस्पिटलच्या मान्यता रद्द केल्याचा मुद्‌द्‌यांवर आगामी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा शासकीय रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल, क्वारंटाइन कक्ष, तसेच शिरवळ येथील तपासणी नाका परिसराची त्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींत समन्वयाचा अभाव दिसत असून, कुणाला तरी झटका येतो आणि लॉकडाउन केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांना वाटले, पालकमंत्र्यांना वाटले की लॉकडाउन, अशा शब्दांत साताऱ्यातील लॉकडाउनची खिल्ली उडवून श्री. दरेकर म्हणाले, ""सातत्याने लॉकडाउन केल्यास लोक उपाशी मरतील. त्यामुळे पालकमंत्र्यांनी समाजाचा कानोसा घेऊन सर्व पक्षातील आमदार, खासदारांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेणे आवश्‍यक होते.'' 

श्री. दरेकर म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात 40 टक्के मनुष्यबळाचा अभाव आहे. मुळात येथे फिजिशियनच नाही. दहा ते 12 डॉक्‍टरर्स व नर्सेसची 50 पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावीत यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी शासनला पत्रव्यवहार केला आहे; पण राज्य सरकारला त्याचे गांभीर्य नाही. जिल्ह्यातील या समस्यांबाबत आजच आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांशी बोलून तत्काळ पदे भरण्याची सूचना करणार आहे.'' जिल्हा रुग्णालयात केवळ सहा व्हेंटिलेटर्स आहेत. इतक्‍या मोठ्या जिल्ह्यात इतकी कमी व्हेंटिलेटर्स हा रुग्णांच्या जिवाशी खेळच आहे. येत्या दोन दिवसांत आणखी 12 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. शिरवळमधील रुग्णालयात रुग्णांना चहा, गरम पाणी, दूध- नाष्टा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचेही श्री. दरेकर यांनी नमूद केले. 

श्री. दरेकर म्हणाले, ""राज्याप्रमाणे साताऱ्यात फार काही वेगळे चाललेले नाही. आजपर्यंत कोरोना उपाययोजनांबाबत एक बैठक झाली असून, त्यातही घरातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. साताऱ्यातील बैठकीला आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना एकदाही बोलावले नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधीत समन्वयाचा अभाव आहे. प्रशासन एककल्ली वागत आहे. आता कुठे जिल्हाधिकारी म्हणतायत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जिल्हाधिकारी, आयुक्त हे मनमानी करत असून, हे जनतेचे राज्य नसून ब्युरोकास्टसारखे राज्य चालविले जात आहे. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे.'' 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे आहेत, तेथील कॉटेज हॉस्पिटलची मान्यता रद्द होते, यासारखे दुर्दैव असूच शकत नाही. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. त्यांच्याच तालुक्‍यातील हॉस्पिटलवर मान्यता रद्द होण्याची नामुष्की येते. त्यातून त्यांच्याच पायाखाली किती अंधार आहे, हे दिसून येते, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली. 

मृत्यूदर लपविण्यापेक्षा मास टेस्टिंग करा 
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीला मान्यता मिळूनही अद्याप सुरू झालेले नाही.÷तयातून शासनाची अनास्था दिसून येते. केवळ एक कोटीचा निधी लागतो. त्यामुळे सरकारने तातडीने कोरोना चाचणी लॅब सुरू करायला हवी. आरोग्य व्यवस्थेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. रुग्णांचा मृत्यूदर लपविला जात आहेत. हे सर्व पारदर्शकपणे का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. दरेकर म्हणाले, ""सरकारने कोरोना आणला असे आम्ही म्हणत नाही; पण चाचण्या कमी केल्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यावर पर्याय म्हणून मास टेस्टिंग करायला हवे.'' 

(संपादन ः संजय साळुंखे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com