
सातारा : गेल्या 60 वर्षांच्या काळानंतरही कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी हजारो प्रकल्पग्रस्त आणि त्यातूनच निर्माण झालेल्या अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित आहे.
गेल्या तीन वर्षांत दोन प्रदीर्घ ठिय्या आंदोलने केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही प्रकल्पग्रस्तांची एकही मूलभूत समस्या मार्गी लागलेली नाही. यामुळे उपासमारी करण्यापेक्षा लढून मेलेले योग्य होईल, अशा निर्णयापर्यंत येऊन येत्या आठ जूनपासून कोयना धरणग्रस्त एल्गार आंदोलन करणार आहेत, अशी महिती धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात डॉ. पाटणकर यांनी म्हटले आहे, की येत्या आठ जूनपासून कोयना धरणग्रस्तांचा हा लढा सुरू होणार आहे. हे आंदोलन कोयना धरणग्रस्त गावातील घरासमोरील अंगणात होईल. त्यामुळे या संदर्भात शासनाने तातडीने निर्देश देऊन कार्यवाही करावी. आजही महाराष्ट्राची महत्त्वाची जीवनरेखा असलेल्या कोयना धरणामुळे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी झालेल्या महकाय अभयारण्यामुळे बाधित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा प्रश्न या परिस्थितीत गुंतलेला आहे.
कोणतीही माणुसकी आणि सामाजिक कृतज्ञतेची जाणीव असलेली व्यक्ती या परिस्थितीमुळे उद्विग्न झाल्यावाचून पर्याय राहू शकत नाही. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास पाहिला तर या जनतेच्या पूर्वज्यांनी सर्वस्वाचा त्याग करण्याची भूमिका घेतलेली दिसते. शासनाने खास यंत्रणा नेमून सकारात्मक आणि न्याय प्रतिसाद द्यावा. जनतेवर मरणाला गवसणी घालण्याची पाळी येऊ देणार नाही, अशी शासनाकडून अपेक्षा आहे.
या वेळी हरिश्चंद्र दळवी, मालोजी पाटणकर, महेश शेलार, सचिन कदम, चैतन्य दळवी, सीताराम पवार, रामचंद्र कदम, अर्जुन सपकाळ, परशुराम शिर्के आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.