सज्जता... राज्यात येणार 116 अद्ययावत बोटी

karad
karad

कऱ्हाड (जि. सातारा) ः मागील वर्षी आलेल्या महापुराच्या संकटातून बोध घेत संभाव्य महापुराच्या मुकाबल्यासाठी शासनाकडून मोठी सज्जता करण्यात आली आहे. त्याअंतर्गत शासनाकडून 116 नवीन बोटी विकत घेत त्या आपत्ती व्यवस्थापन पथकात समाविष्ठ केल्या जाणार आहेत. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीतील आपतग्रस्तांची गैरसोय टळून तातडीने आधार मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठीची सध्या युध्दपातळीवर कार्यवाही सुरू आहे. 

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 2005 पेक्षाही मोठा महापूर आला. अनेक ठिकाणी 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्यामुळे नद्या-नाले-ओढे ओसंडून वाहिले. धरणेही तुडुंब भरली. परिणामी पावसाचे पाणी, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, ओढ्या-नाल्यांचे पाणी यामुळे मोठा महापूर आला. पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने यापूर्वीच्या पूररेषेच्या सर्व पातळ्या मागील वर्षीच्या महापुराने तोडून टाकल्या. त्यामुळे शासनाला प्रत्येक ठिकाणची पूररेषाही नव्याने निश्‍चित करावी लागली. दरम्यान, मागील वर्षी आलेल्या महापुराने जनावरे, शेती पिके, जमीन, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावांमध्ये पाणी घुसू लागल्यावर प्रशासनाने तातडीने घरे खाली करून ग्रामस्थांना गावाबाहेर जाण्याचे आदेश दिले. काही गावांना तर चारही बाजूने महापुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना बोटीची आवश्‍यकता होती. मात्र, वेळेत बोट न मिळाल्याने अनेक जण घरातच अडकून पडले. बाहेर पडण्याची तयारी करूनही त्यांना तीन-चार दिवस बोटच मिळाली नाही. 

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होवून संपर्कही तुटला होता. बोटी उपलब्ध असत्या तर लोकांना तातडीने मदत मिळून ते पुराबाहेर येऊ शकले असते, असे शासनाने महापुरानंतर केलेल्या सर्व्हेत स्पष्ट झाले. त्याचा अहवाल संबंधित पूरबाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळवला होता. त्याचा विचार करून शासनाने आता नव्याने 116 अद्ययावत बोटी खरेदी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी नऊ कोटी 28 लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच आपत्ती व्यवस्थापनाच्या ताफ्यात नव्या सुसज्ज बोटी दाखल होतील. त्यामुळे संभाव्य महापुराच्या काळात नागरिकांना मदतीसाठी त्याचा उपयोग होऊन संकट दूर करण्यास मदत होणार आहे. 

पूरबाधित तहसीलला मिळणार दोन बोटी 
राज्यातील जे पूरबाधित तालुके आहेत, त्या तालुक्‍यांतील गावांत आलेल्या पुराच्या आपत्तीवेळी तातडीने बोटींची उपलब्धता व्हावी, यासाठी शासनाने तयारी केली आहे. त्याअंतर्गत पूरबाधित गावांच्या तहसीलच्या ठिकाणी किमान एक ते दोन बोटी उपलब्ध असाव्यात, यादृष्टीने शासनाने नवीन बोटी खरेदी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आता प्रत्येक पूरबाधित तालुक्‍याच्या तहसीलच्या ठिकाणी किमान दोन बोटी दाखल होणार आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com