
केळघर(जि.सातारा) : विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चारपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, नाले न काढल्यामुळे रस्त्याचे पाणी लगतच्या शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना मन:स्ताप देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
विटा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम जावळी तालुक्यात मेढा, केळघर व केळघर घाट या परिसरात वेगाने सुरू आहे. हे काम करताना बहुतांशी ठिकाणी मोऱ्या तसेच रस्त्याची उंची वाढवल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाले न काढल्याने रस्त्यालगत असणाऱ्या भात खाचरामध्ये रस्त्याचे पाणी घुसत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने ही खाचरे पाण्याने तुंबलेल्या अवस्थेत आहे. खाचरातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने काही ठिकाणी भात खाचरांच्या ताली पडलेल्या आहेत.
वास्तविक रस्त्याचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूने नाले उकरणे गरजेचे होते. शेतकऱ्यांनी ही बाब संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊनही हे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्यांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, नाले न काढल्याने आंबेघर, गवडी येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, ठेकेदाराने तातडीने नाले काढून द्यावेत, अशी मागणी आंबेघर येथील आनंदा शेलार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
मेढा-केळघर रस्त्यावर ज्या ठिकाणी नाले नाहीत. त्या ठिकाणी तातडीने नाले काढण्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ही बांधकाम विभागाची भूमिका आहे.
-कृष्णात निकम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मेढा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.