तारळीच्या पाण्याअभावी शेतकरी चिंतेत, अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावी

Satara
Satara

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील दहा ते 15 गावांच्या पाण्यासाठी तारळी योजेनतून पाणी मिळते. हा कालवा पूर्ण होण्यासाठी तब्बल 25 वर्षांचा कालावधी लागला. आता कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उरमोडी, टेंभू व तारळीच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने कालव्याला पाणी सुटले नाही. सध्या तारळीच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. तर पाण्याअभावी ऊस व जनावरांच्या चाऱ्याची पिके जळून चालली आहेत. येत्या आठ दिवसांत कालव्याला पाणी सुटले नाही तर शेतकरी आक्रमक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. 

याबाबतची अधिक माहिती अशी, तब्बल एक हजार 610 दहा कोटी रुपये निधी खर्च करून तारळीचा प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पातून खटाव व माण तालुक्‍यांतील एकूण आठ हजार 876 हेक्‍टर इतक्‍या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी आजवर चार वेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व 26 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे धोंडेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी, अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा शेतीचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. याबाबत मार्च 2020 मध्ये वरीलपैकी बहुतांशी ग्रामपंचायतींनी ठराव करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले. मात्र, अधिकाऱ्यांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाल्याने पाणी शेतात खळाळले नाहीच. त्यास उरमोडी-तारळी प्रकल्पांचे अधिकारी व कालवा सल्लागार समितीत ताळमेळ नसल्याने पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

खटावच्या पूर्व भागातील शेतकरी पैसे भरण्यासाठी तयार असताना अधिकाऱ्यांची वरची लेव्हल, त्यांच्या बोलण्यातून त्यांना माणला जाणवणारी तीव्रताही जादा दिसून येत आहे. त्यामुळेच हे पाणी खटावकरांना मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उरमोडीचे पाणी माण तालुक्‍याला देण्याचे काम सुरू आहे. माण तालुक्‍याला अद्याप 20 दिवस उरमोडीचे पाणी सोडले जाणार आहे. 20 दिवसांनी पाणी येईपर्यंत एक तर शेतातील पिकांची पूर्णपणे होळी झाली असेल नाही तर मॉन्सूनचा पाऊस 
सुरू झाला असेल. तारळी योजनेचे पाणी या उरमोडीच्या कालव्यामधून पूर्व भागातील गावांना दिले जाते. 

नेतेमंडळींनी एकी दाखवावी 

हा पूर्ण भागाच्या अस्तित्वाचा विषय आहे. त्यामुळे तारळीच्या पाणी प्रश्नासंदर्भात सांगली पॅटर्नप्रमाणे निमसोडचे मोरे-देशमुख, मायणीचे गुदगे-येळगावकर, तसेच तालुका पातळीवर काम करणाऱ्या सर्वच 
राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात एकी दाखवावी. निवडणुकीच्या वेळी आपापले पक्ष, गट-तट जरूर शाबूत ठेवावेत, असा सूर गावोगावच्या शेतकऱ्यांतून येत आहे. 
 

...अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील 

आमच्या बाजूने उरमोडीचे पाणी जात असेल व अधिकारी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी सांगून जनतेची दिशाभूल करत असतील तर पूर्व भागातील शेतकरी आक्रमक होऊन कायदा हातात घेतील. तारळीचा पाट खोदण्याबरोबर अधिकाऱ्यांना फिरकुही दिले जाणार नाही, असा इशारा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, धोंडेवाडीचे सरपंच हणमंतराव भोसले, सूर्याचीवाडीचे रामचंद्र घोलप, एनकूळचे संतोष ढोले व राजेंद्र खाडे, दातेवाडीचे सदाशिव हांगे यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com