अभयारण्यात हाेणार आणखी वनराई

khatav
khatav

मायणी (जि. सातारा) : येथील भारतमाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रानावनात फेकलेल्या बीजगोळ्यांची आता टवटवीत व हिरवीगार रोपे तयार झालीत. त्यामुळे येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यातील हिरवाई वाढीस मदत होणार आहे. 

गतवर्षी येथील भारतमाता विद्यालयाने बीजगोळे (सीडबॉल) निर्मितीचा विशेष उपक्रम राबवला. उपक्रमशील शिक्षक महेश जाधव व सहकारी शिक्षकांच्या एकजुटीतून विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या विविध झाडांच्या बियांचे सुमारे सहा हजार बीजगोळे तयार झाले. श्रावणी सहली व वन महोत्सवाचे औचित्य साधून येथील अभयारण्य परिसरात बीजगोळे टाकण्यात आले. रावनावनात फेकून दिलेले बीजगोळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अंकुरलेले दिसत आहेत. बीजगोळ्यांचे निसर्गतः प्रत्यक्ष रोपांत रूपांतर झाले असून वनक्षेत्रांत हजारो रोपे नव्याने निर्माण झाली आहेत. त्यामुळे रानावनातील हिरवाईत भर पडली आहे. मायणी अभयारण्य परिसर व वनक्षेत्र आगामी काळात हिरवेगार होण्यास मदत होणार आहे. 

दरम्यान, वन विभाग व अभयारण्य परिसरात बहुतांश वृक्ष पानझडी प्रकारचे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात ती सर्व झाडे निष्पर्ण होतात. अभयारण्याचा परिसर भकास दिसतो. तो आगामी काळात हिरवागार राहण्यास मदत होणार आहे. तेथील सृष्टीसौंदर्य वाढणार असून निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी सुखदायक होणार आहे, असे महेश जाधव यांनी सांगितले. दरम्यान, बीजगोळ्यांच्या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, मुख्याध्यापक बाळकृष्ण इनामदार यांच्यासह विविध मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 


उजाड, भकास माळराने व डोंगर टेकड्या या वृक्षराजींनी हिरव्यागार करण्यासाठी बीजगोळ्यांचा उपक्रम सर्व शाळांच्या माध्यमातून राबवणे गरजेचे आहे. 

- महेश जाधव, शिक्षक, मायणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com