राज्यातील शिक्षकांपुढे आता मान्यतेचे आव्हान

शाळांच्या पटसंख्येचे निकष
शाळांच्या पटसंख्येचे निकष

खंडाळा (जि. सातारा) : जून महिना म्हटले की शैक्षणिक क्षेत्रातील धावपळ आपण पाहतो. शाळेतल्या नव्या प्रवेशासाठी विद्यार्थी उत्सुक असतात तर पालक आपल्या पाल्याला योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल का? या प्रयत्नात असतात. एवढंच नाही तर आपल्याच शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षकही घरोघरी वणवण करत असतात. स्वत:च्या पोटासाठी आणि शाळेच्या पटसंख्येसाठी मेहनत घेण्याचा त्यांचा उद्देश असतो. शासनाच्या निकषाप्रमाणे शाळा आणि तुकडी टिकवणे, हे त्यांच्यापुढील आव्हान असते. पण, यंदा कोरोनाच्या महामारीने स्थिती वेगळीच आहे. 

जुलै महिन्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन प्रयत्नशील आहे. पण, त्याचे नियम, निकष काय असणार, याबाबत सर्वांमध्ये संभ्रमावस्था आहे. बाहेर कोरोनाचा धोका आणि मनात पटसंख्येची धास्ती अशा द्विधा मन:स्थितीत शाळांचे शिक्षक आहेत. सर्व जगाला हैराण केलेल्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या घरी जाता येत नाही. आपली शाळा कशी डिजिटल आहे? किंवा गुणवत्ताधारक आहे? असे काहीही पालकांना न सांगता येण्यासारखी स्थिती असल्याने आणि पालकही आता मिळेल त्या शाळेत मुलांना प्रवेश देण्याच्या मन:स्थितीत असल्याने यंदा आपल्या शाळेची पटसंख्या पूर्ण होणार का, त्याचे दडपण शिक्षकांना जाणवणार आहे. 

एका शैक्षणिक सर्व्हेनुसार राज्यभरात दरवर्षी किमान 200 शाळेत पटसंख्या कमी होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा शाळा टिकवणे, तुकडी टिकवणे, कमी पटाच्या शाळा टिकवणे, जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षक टिकवणे अवघडच नाही तर मोठी तारेवरची कसरत ठरणार आहे. 

पटसंख्येअभावी दरवर्षी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतात आणि प्रत्येक वर्षी पटाच्या आकड्यांची जुळवाजुळव करून शिक्षक टिकवला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे अशी जुळवाजुळव करून दरवर्षी टिकवला जाणारा पटाचा आकडा यावर्षी मात्र सपशेल फेल होण्याच्या मार्गावर दिसत आहे. यामध्ये अधिकची भर म्हणजे पालकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने, जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनुसार जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे मत बहुसंख्य पालक व्यक्त करत आहेत. 

महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत असल्याने अनेक परराज्यांतील कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. मात्र, कोरोनामुळे या अख्ख्या कुटुंबांचे स्थलांतर आपापल्या राज्यांमध्ये झाल्याचा परिणामही शाळांच्या पटसंख्येवर दिसण्याची चिन्हे आहेत. शिरवळसारख्या औद्योगिक परिसरात तर 30 टक्के मुले स्थलांतरित झाली असल्याचा अंदाज एका मुख्याध्यापकाने व्यक्त केला आहे. 

शाळेची पटसंख्या कमी झाल्यास आपण अतिरिक्त होणार नाही ना? अशी भीती शिक्षकांना असून, शासनाने पटसंख्येचा निकष ठरवताना यावर्षी कोरोनाची भीती व स्थलांतरित कुटुंब याचा विचार करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे शिक्षकांचे मत आहे. 

कोरोनाच्या विळख्याने शैक्षणिक संस्थांनाही ग्रासले आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत बराच बदल अपेक्षित आहे. या बदलांकडे एक संधी म्हणून पाहावे लागेल. नव्याने सुविधा तयार कराव्या लागतील. ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यास व्यवस्था करावी लागेल. तसेच कोरानाची भीती, स्थलांतरित विद्यार्थी याबाबत सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. 
-प्रतापराव निकम, 
मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळ 

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालक या नात्याने पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही इच्छा आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गर्दीच्या ठिकाणी मुलांना शाळेत पाठवण्याबाबत आम्ही अनुकूल नाही. त्यामुळे कोरोनावर लवकर लस निघावी. 
-दत्तात्रय पवार, 
पारगाव (ता. खंडाळा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com