Satara : उधळपट्टी केल्यानेच ‘किसन वीर’वर ही वेळ - सौरभ शिंदे

आता तरी प्रतापगड आमच्या ताब्यात द्या
Satara : उधळपट्टी केल्यानेच ‘किसन वीर’वर ही वेळ
Satara : उधळपट्टी केल्यानेच ‘किसन वीर’वर ही वेळ

कुडाळ : प्रतापगड- किसन वीरच्या कराराचे तुणतुणे वाजवता मग त्यातील अटींचे आपण पालन केले का? असा सवाल करत कारखाना चालवायला घेताना ५१.४० कोटींची जबाबदारी असताना आठ वर्षांत अद्यापही ८ कोटींचे देणे बाकी ठेवले आहे. या शिवाय कारखान्याच्या मालमत्तेवर आणखी सिंधुदुर्ग बँकेचे ४० कोटींचे कर्ज वाढवून ठेवले आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना ब्लॅक लिस्टमध्ये घालवला. या यादीत प्रतापगडचे नाव नाही. यावरूनच ढिसाळ नियोजन कुणाचे हे स्पष्ट होते. सत्तेचा उतमात करून शेतकरी-सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करताना नटनट्यांची व सेलिब्रिटींची उठाठेव करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत बसला नसता, तर ही वेळ किसन वीरच्या प्रशासनावर आली नसती, अशी टीका प्रतापगड कारखान्याचे संचालक व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी माजी आमदार मदन भोसले यांच्यावर केली.

किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन प्रतापगड कारखान्याच्या व्यवस्थापनावर केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी कुडाळ येथे प्रतापगडच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद आयोजिली होती. त्या वेळी ते बोलत होते. श्री. शिंदे म्हणाले, ‘‘किसन वीरने शेतकरी सभासदांच्या उसाचे पैसे एफआरपीप्रमाणे अद्याप दिले नाहीत, तसेच कारखाना करारावेळी प्रतापगडचे कामगार यादीत असतानाही त्यांना किसन वीर व्यवस्थापनाने सिझनल ठेवले. प्रतापगडच्या कामगारांचे चौदा महिन्यांचे वेतन दिले नाही. आठ वर्षांचा लेखाजोखा करायचाच असेल तर जाहीरपणे करण्यास माझी तयारी आहे.

प्रतापगडमध्ये किसन वीरने कोणतीही गुंतवणूक केली नाही. उलट कारखान्यावर आणखी कर्ज वाढवून ठेवले आहे. प्रतापगड चालवायला घेतला ही चूक असेल तर तो आमच्या व्यवस्थापनाला परत द्यावा व चूक सुधारावी. स्वतःची अकार्यक्षमता आमच्या माथी मारू नये. आम्ही त्रास दिला म्हणून प्रतापगड चालला नाही म्हणता मग खंडाळा व किसन वीर कारखान्यांचे गाळप एवढे कमी का झाले, याचे उत्तर द्यावे. ऊसबिल अजूनही दिले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले. किसन वीरवर बोजा किती यांच्याशी प्रतापगडला देणे घेणे नाही. आम्ही कोणत्याही विषयावर उघड बोलण्यास तयार आहे. तयारी असल्यास जाहीरपणे व्यासपीठावार यावे.’’

५२ हजार सभासद शेतकऱ्यांच्या चुली बंद करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा फुकटचा आव आणू नये. कोणताही कारखाना बंद ठेवणे हे शेतकऱ्यांवर अन्यायच म्हणूनच आमचा कारखाना आमच्या ताब्यात द्या, कामगारांचे जवळपास नऊ कोटी थकीत असून, प्रतापगडची वीजबिल थकल्यामुळे वीजही कट करण्याची नामुष्की किसन वीरमुळे ओढवली आहे. अंगलट येणाऱ्या मुद्द्यांवर लवादाच्या आड लपायचे आता सोडून द्यावे व वस्तुस्थिती मान्य करून स्वतःचा नाकर्तेपणा आता मान्य करावा,’’ असा टोलाही त्यांनी लगावला. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे, संचालक मालोजीराव शिंदे, बाळासाहेब निकम, प्रदीप तरडे, उत्तम पवार, नारायण पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com