इतकी तुमची लोकप्रियता होती तर लोकसभेत पराभव का झाला? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला I Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale

उदयनराजेंनी हा वाद नव्हता केवळ गैरसमज झाला होता, असं सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तुम्हीही लोकांची कामं करा, लोक तुमचेही पेटिंग काढतील असा सल्ला दिला होता.

Politics : इतकी तुमची लोकप्रियता होती तर लोकसभेत पराभव का झाला? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : साताऱ्यात खासदारांच्या पेटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचं लक्षण आहे. पेटिंग त्रयस्थांनी काढलं असतं तर समजणं शक्य होतं. पण, त्यांच्याच बगलबच्चांनी पेटिंग काढायचं आणि लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदोउदो करायचा हे काही खरं नाही. एवढं जर जनतेचं प्रेम असतं तर लोकसभेला पडला कसं याचं आत्मचिंतन करावं, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी उदयनराजेंना लगावला.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या पेटिंगवरून राजे समर्थक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये गैरसमजातून वाद निर्माण झाला होता. उदयनराजेंनी हा वाद नव्हता केवळ गैरसमज झाला होता, असं सांगून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना तुम्हीही लोकांची कामं करा, लोक तुमचेही पेटिंग काढतील असा सल्ला दिला होता. त्याला आज शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) यांनी प्रतिउत्तर दिलं.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवरायला हवं. प्रशासनावर त्यांची दैनंदिन कामे सोडून कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावं लागेल असं कोणतंही कृत्य करू नये. खासदारांचं पेटिंग एखाद्या त्रयस्त व्यक्ती किंवा यंत्रणेमार्फत काढलं गेलं असतं तर ते समजू शकलो असतो. मात्र, खासदारांच्याच गाडीत बसणाऱ्या बगलबच्चांनी त्यांची पेटिंग काढायचं आणि मी कसा लोकप्रिय आहे याचा त्यांनी उदोउदो करायचा हे न समजण्याच्या पलीकडं आहे.

लोकप्रियता जर इतकी होती तर लोकसभेत (Satara Lok Sabha Election) पराभव का झाला याचं आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. लोकांच्या विकासकामांना महत्त्व देणं अतिशय गरजेचं आहे. कोणी माझं पेटिंग काढावं यामध्ये मला रस नाही. मला माझ्या मतदारसंघामध्ये लोकांसाठी केलेल्या कामाची पूर्तता करणं यामध्ये रस आहे. त्यामुळं या मतदारसंघातून बहुतांश वेळा मला प्रतिनिधित्व मिळालं आहे. ते आमच्या कामांमुळंच पेटिंगचा हा प्रकार अत्यंत बालिशपणाचा आहे, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला.