Wayward Youth : भरकटणाऱ्या तरुणाईला आवर घाला

बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गाठीशी चार पैसे नाहीत. परिणामी, चारचौघांत वावरताना त्यांची आर्थिक घुसमट होत असते
unemployed youth financially problem Wayward Youth crime police
unemployed youth financially problem Wayward Youth crime policesakal

मायणी : बेकायदा व्यवसायातील स्पर्धा, वर्चस्ववाद तर कधी जुना वाद उकरून काढत किरकोळ कारणावरून व्यक्तिगत आणि गटागटाने होणाऱ्या हाणामारी खटाव तालुक्यात वारंवार होतच असतात.

मात्र, गेल्या आठवड्यापूर्वी येथे एकाला वर्दळीच्या ठिकाणी, भर रस्त्यावर भोसकले. त्यामुळे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या बेलगाम तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक शांतता व सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी कुटुंबीय, समाजातील बुजुर्ग, प्रभावशाली व्यक्ती, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गाठीशी चार पैसे नाहीत. परिणामी, चारचौघांत वावरताना त्यांची आर्थिक घुसमट होत असते. ती दूर करण्यासाठी बेरोजगार तरुण उत्पन्नाचे विविध मार्ग शोधत आहेत.

व्यवसाय, धंद्यासाठी आर्थिक तरतूद होऊ शकत नसल्याने अनेक तरुण बेकायदा व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. काहींनी बेकायदा वाळू उपसा व पुरवठा, चंदन तस्करी, कृत्रिम दूध निर्मिती व भेसळ अशा विविध बेकायदा धंद्यात जम बसविला आहे.

उजळ माथ्याने व प्रतिष्ठेने समाजात ते मिरवत आहेत. बेकायदा व्यवसाय वाढीसाठी अनेक गरजू तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. आर्थिक बळ मिळत आहे. त्यामुळे बेकायदा धंद्यामध्ये दिवसेंदिवस तरुणांची संख्या वाढत आहे. विना भांडवली बक्कळ पैसा मिळत असल्याने स्पर्धा आणि वर्चस्ववाद निर्माण होत आहे. चार- सहा महिन्यांतच बेकायदा धंद्यातून मिळालेल्या पैशातून लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन फिरताना तरुण दृष्टीस येत आहेत.

मौजमजा व चैनीचे जीवन जगत आहेत. अशा तरुणांनी पैसा आणला कुठून? मिळविला कसा? याबाबत कुटुंबीयांकडूनही खडसावले जात नाही. विचारपूस केली जात नाही. विचारलेच तर त्यांना दादही मिळत नाही.

त्यामुळे तरुणांवर कुटुंबीयांचा अजिबात धाक राहिलेला नाही. धाक असायलाच हवा अशा पोलिसांच्या गाडीवरच ते तरुण फिरताना दिसत असतात. काही गैरकृत्य झाल्यास ‘मै हूं ना!’ कशाला घाबरतोस. मिटवून टाकू. साहेब आपलेच आहेत. अशाप्रकारे अभय मिळत असल्याने तरुणांचे धाडस वाढते आहे. त्यामुळे गुन्हेगारी कृत्यांत वाढ होताना दिसते.

गैरकृत्यास पाठबळ देणाऱ्या बुजुर्ग मंडळींनी तात्पुरता विचार न करता भविष्यकालीन दुष्परिणामांची तमा बाळगणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनीही गुन्हेगारीकडे वळलेल्या व त्या वळणावर असलेल्या तरुणाचे, त्यांच्या कुटुंबीयांचे, संबंधित समाज घटकांचे वारंवार समुपदेशन करणे आवश्यक आहे.

विशेषत: पोलिसांनी अशा समाज घटकांच्या बैठका घेऊन त्यांना कायद्याची माहिती द्यायला हवी. पुढील धोके, कायद्यानुसार होणाऱ्या कठोर शिक्षा लक्षात आणून द्यायला हवेत. बेकायदा धंदे करण्याचे कोणा तरुणाचे धाडस होणार नाही. इतका वर्दीचा धाक निर्माण व्हायला हवा. पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून खाकीचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे.

त्यासाठी आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील खबऱ्यांचे नेटवर्क वाढविणे आवश्यक आहे. प्रत्येक गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्यास आपसूक समाजात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होईल. तरुणांनीही स्वतःहून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती, गटापासून दूर राहायला हवे. स्वयंशिस्तीने योग्य मार्गाचा अवलंब करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com