नोबेल, पद्मविभूषण जिंकणारे हरित क्रांतीचे जनक माहितीयेत का?

सौजन्य - द मिनिसोटा डेली
सौजन्य - द मिनिसोटा डेली

विज्ञानविश्वात असे एकेक मोहरे होऊन गेलेत ज्यांचे आखिल मानवसमुहावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या कामाच्या प्रेरणा आणि एकूणच आवाका बघता अनेकदा ते साधू-संत-श्रद्धास्थानाहूनही काकणभर श्रेष्ठ ठरतात. आज याच श्रेणीतल्या एका महामानवाची गोष्ट आपण वाचणार आहोत.

त्याचे पणजोबा नॉर्वेहून अमेरिकेत स्थायिक झालेले विस्थापित. त्याचं कुटूंब मध्यपश्चिमी इलाक्यातील ‘लोवा’ नामक निमशहरी भागात नॉर्वेच्या सहकाऱ्यांसोबत स्थिरावलं. स्थानिक चर्चचं सभासदत्व घेत ते इथं चांगलेच रमले आणि इथंच चार भावंडात पहिला आणि पॅमा,लिलियन, चॅरलोट,हेलन या बहिणींचा एकूलता एक भाऊ असणाऱ्या त्याचा बाप्तिस्माही झाला. वयाच्या एकोणीसाव्या वर्षापर्यंत त्याचं बालपण आणि पौगंडावस्था घरची शेती-पशुपालन आणि ग्रामीण भागातील एकशिक्षकी शाळेत शिकणं यात गेलं.

हायस्कूलला गेल्यानंतर त्याच्यातील सुप्त गुणांना अधिकच वाव मिळाला. फूटबॉल-बेसबॉल-कुस्ती या खेळातही त्यानं विशेष प्राविण्य मिळवलं..त्याचे क्रिडा शिक्षक त्याची खेळातली विशेष गती बघून प्रोत्साहीत करत. क्रिडा-शेती-अभ्यास सगळीकडं त्याचा वावर होता पण एके दिवशी आपल्या जवळ बोलावून घेत त्याच्या आजोबांनी त्याला एक कानमंत्र दिला, जर तुला उद्या पोटाला चांगला ‘खुराक’ हवा असेल तर आता तु तुझ्या डोक्याला खुराक देणं शहाणपणाचं ठरेल.

त्यानं मिनीओस्टा विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी अर्ज दिला पण तो प्रवेश परिक्षेत अनुत्तीर्ण झाला परंतू तिथं नव्यानं सुरू झालेल्या सामान्य महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. दोन सत्रानंतर वनीकरण अभियानासाठी त्याला महाविद्यालयाच्या ‘कृषी’ विभागात रवाना करण्यात आलं. महाविद्यालयीन काळात त्याची विद्यापीठाच्या कुस्ती संघात निवड झाली. तिथं तो उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आणि त्याची राज्यस्तरीय सराव सामन्यांसाठी निवड झाली. शिक्षण फक्त पुस्तकातच असतं असं नव्हे कुस्तीनं त्याला मानसिकदृष्ट्याही सक्षम बनवलं,स्वत:ला जोखायची आवड निर्माण केली,स्पर्धेस तोंड द्यायला,यश आणि अपयश दोन्ही चाखायला शिकवलं केवळ पुस्तकातच अडकून बसला असता तर तो तसा घडला नसता जसा घडला.

वैचारिक जडणघडण-व्यक्तीमत्व विकास वगैरे संकल्पना ऐकायला फार छान वाटतं पण ते असं ‘चॉकलेट’ विकत घ्यावं तितक्या सहजपणं होत नाही. त्याला शैक्षणिक शुल्कासाठी अधूनमधून काम करणं भाग होतं. तो नागरी संवर्धन दलात सामिल झाला.त्यानं अनेक शासकीय प्रकल्पात भाग घेतला. नेतृत्व केलं. तिथं पहिल्यांदा त्याला ‘उपासमार’ काय असतं ते कळलं कारण लोकं एका वेळच्या जेवणासाठी हे सरकारी काम सोडत होती पण तो तिथं विज्ञानाचा पदवीधर होईपर्यंत टिकला आणि शिक्षण संपल्यावर लागलीच वनविभागात रुजू झाला..

‘सालमोन’ नदीच्या खोऱ्यात निबिड जंगल क्षेत्रात त्यानं काम केलं. सोबतच एल्विन चार्ल्स स्टॅकमन यांचं ‘सिग्मा११’ हे व्याख्यानही ऐकलं आणि ‘वनस्पती रोगनिदानशास्त्र’ या विषयात त्याची रुची वाढली. बुरशी-आळी हे इवलेसे जीव धनधान्य फस्त करतात याची त्याला जाणीव झाली आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट यात संशोधनात्मक काम सुरू झालं ते झालंच. अनेक लहानमोठ्या संशोधनानंतर त्यानं कृषी विज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक आणि शास्रोक्त तंत्रज्ञान आणत गव्हाचं उत्पादन सातशे पटीनं वाढवत जगाची भूक भागवली. जवळपास एक अरब लोक भूकबळी होण्यापासून वाचले.

संशोधन-प्रयोग इथपर्यंतच त्याचं काम मर्यादित होतं असं नाही शेवटच्या माणसापर्यंत अन्न पोहोचावं यासाठी त्यानं शासनाच्या आर्थिक धोरणातही आपलं योगदान दिलं. महाविद्यालयीन काळात गरीबीचे चटके अनुभवल्यानं त्याला गरीबांविषयी कणव निर्माण झाली होती. तो सातत्यानं ताळागाळातील लोकांच्या मदतीसाठी हजर होत गेला. ‘ड्यूपॉन्ट’ मध्ये स्थायी नोकरी असतांना राजीनामा देत त्यानं आपला मुक्काम मेक्सिकोत हलवला आणि रोग प्रतिरोधक अश्या गव्हाच्या नव्या प्रजातीवर संशोधन सुरू केलं. यात यशस्वी होत त्यानं तिथलं गव्हाचं उत्पन्न इतकं वाढवलं की जिथं पूर्वी खायला नव्हतं, तो देश आता गव्हाचा निर्यातदार झाला.

सत्तरच्या दशकात भारतात भयंकर दुष्काळ पडला होता. दिल्लीत भारतीय कृषि अनुसंधान संस्थान केंद्रात एक दाक्षिणात्य कृषि वैज्ञानिक कार्यरत होते ज्यांना लॅटीन अमेरिकेत काय सुरू होतं, याची वदंता लागली त्यांनी याला आमंत्रित केलं. ते दक्षिण भारतीय कृषी संशोधक म्हणजे स्वामीनाथन आणि त्यांनी आमंत्रित केलेली ही व्यक्ती म्हणजे नॉर्मन बोरलॉग...रेस्ट इज हिस्ट्री!

अगदी काही महिन्यातच देशाला दुष्काळावर मात करता आली. बोरलॉग यांनी संशोधन केलेल्या गव्हानं भारतीय मातीत अजूनच चमत्कार दाखवला. १९६६ पर्यंत गहू आयात करणाऱ्या भारताचं स्वत:चं गहू उत्पादन दुपटीनं वाढलं. बोरलॉग यांच्या संशोधनानं आपला उपाशी शेजारी पाकिस्तानचं गहू उत्पादनही ४५वरून ८४ लाख टनांवर नेलं. हे सगळं झालं नसतं तर एक मोठी लोकसंख्या अन्नधान्यापासून वंचित राहिली असती. प्रचंड लोकसंख्या असलेला हा भूभाग आजही पुरेसं अन्नधान्य पिकवतो तो यामुळंच!

अर्थात नैसर्गिक पिकात जनुकीय सुधारणा करतो म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी त्यांचावर टीकाही केली पण हे तंत्र सुरक्षित होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करोडो लोकांची भूक भागवत होतं. कमी जागेत कृषी उत्पादन वाढल्यानं जंगलतोडही थांबली होती आणि करोडो लोकांच्या तोंडात घास आला होता. बोरलॉग यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ आणि पाकिस्तानचा नागरी सन्मान ’सितारा-ए-इम्तियाज’ आणि जागतिक शांततेसाठी नोबेलही मिळाला.

भूकेकंगाल आणि जातधर्माच्या विळख्यात अडकलेल्या मोठ्या लोकसंख्येची क्षुधा भागली. २००९ साली वयाच्या ९५व्या वर्षी लौकीकार्थानं ‘बोरलाॉग’ हे जग सोडून गेले. पण आपल्याकडं आजही त्यांनी संशोधित केलेल्या गव्हाची चपाती बनवली जातेय. १९७०साली आजच्याच दिवशी बोरलॉग यांना ‘शेती आणि पर्यावरण’ या क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी ‘नोबेल’ मिळालं होतं. पण खरं तर त्यांचं हरीत क्रांती संदर्भातलं काम बघता ते विज्ञानासोबतच शांततेसाठी मिळणाऱ्या पुरस्काराचेही तितकेच मानकरी ठरतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com