उपग्रहाच्या मदतीने दुष्काळी गावांचे सर्वेक्षण

उपग्रहाच्या मदतीने दुष्काळी गावांचे सर्वेक्षण

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने माण तालुक्‍यातील (जि.सातारा) दुष्काळी गावांचे सर्वेक्षण केले. या अंतर्गत त्यांनी गावात जाऊन माहिती संकलित केली. उपग्रहाच्या मदतीने तेथील पिकांची स्थिती, भूगर्भातील पाणीपातळी, या दशकातील पर्जन्यप्रमाण, दहा वर्षांतील दुष्काळाची तीव्रता या गोष्टींची माहिती संकलित केली. याचा अहवाल त्यांनी शासनाला सादर केला आहे.  

पीक आणेवारी पद्धतीने दुष्काळी भागाचे सर्वेक्षण करण्याची पद्धत पूर्वापार आहे, मात्र आता काही सर्वेक्षणांसाठी उपग्रहाची मदत घेतली जाते. यामुळे अचूकतेबरोबरच विविध दृष्टिकोनांतून माहिती संकलित केली जाते. याचे स्वतंत्र शास्त्र विकसित झाले असून शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागात याबाबतचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिओ इन्फॉरमेटिक’ हा अभ्यासक्रम सुरू आहे.  या अंतर्गत विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील गावांचे सर्वेक्षण केले. त्यांना दुष्काळग्रस्त भूभागाची नेमकेपणाने निश्‍चिती आली.

त्याचबरोबर पिकांची स्थिती, त्या परिसरातील दुष्काळी काळातील तापमान, हवेतील आर्द्रता दशकातील पर्जन्याचे प्रमाण, वेळा, स्वरूप यांबाबतही विस्तृत माहिती मिळाली. अशाच पद्धतीने त्यांनी पाणलोट विकास कार्यक्रमासाठीही उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले. यात जमिनीची स्थिती, उतार, पाण्याची उपलब्धता, जमिनीला पडलेल्या भेगांची खोली, रुंदी याचीही पाहणी उपग्रहाच्या माध्यमातून केली जाते. यामुळे पाझर तलावांची जागा निश्‍चिती खात्रीशीर होते. विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने भुदरगड तालुक्‍यातील जमिनींचे गटनंबर निहाय सर्व्हेक्षण केले आहे. पंचगंगा नदीची पूररेषा निश्‍चितीही या विद्यार्थ्यांनी उपग्रहाद्वारे केली. जंगलांना लागणाऱ्या आगींबाबतही सर्व्हेक्षणाचे काम या विभागात सुरू आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिओ इन्फॉरमेटिक या अभ्यासक्रमासाठी ३० विद्यार्थ्यांची बॅच आहे. भविष्यात संरक्षण, कृषी, टाऊन प्लॅनिंग यासह बहुतांशी क्षेत्रांत उपग्रहाद्वारे सर्वेक्षणे केली जातील. विद्यार्थ्यांनी शासकीय संस्थांच्या माध्यमातून केलेली ही सर्वेक्षणे लोकोपयोगी आहेत. 
- प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, 

विभागप्रमुख, भूगोल विभाग

उपग्रह सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये
उपग्रहामुळे ऑप्टिकल रिमोट सेन्सर, थर्मल रिमोट सेन्सर यांआधारे माहिती घेता येते. यामुळे तेथील तापमान, आर्द्रता, पाणथळ जागा यांची अचूक माहिती मिळते. याबाबतची वर्षभरातील माहितीही उपग्रह देतो. थ्रीडी पिक्‍चरमुळे शहरी भागातील सर्वेक्षणे करणे अधिक सोपे होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com