
Datta Bhojan Patra : कोल्हापूरातल्या या मंदिरात आहे दत्त महाराजांनी भोजन केलेलं ताट!
आपण राहत असलेल्या पृथ्वीवर देवी देवतांचा वास होता किंवा आहे. याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. दगडात कोरलेली लेणी, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे हे त्याचेच पुरावे आहेत. गुरू दत्तांनी तर भारतभ्रमण केले होते. त्यांनी जिथे जिथे काही वास्तव्य केले. ते ठिकाण पवित्र झाले.(Datta bhojan patra mandir in shirol history)
देव आहेत म्हणजे त्यांना काही त्रास सहन करावा लागला नसेल, असे नक्कीच आपल्याला वाटते. पण, तसे नाही. साक्षात दत्त महाराजांनाही जेवणासाठी ताट न मिळाल्याने एका दगडालाच ताट बनवून त्यात जेवावे लागले होते. पण, धन्य झाले तो दगड ज्याने महाराजांना जेऊ घातले. दत्त महाराजांनी भोजन केलेले पात्र आजहू पहायाला मिळते. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.
कोल्हापूरातल्या शिरोळ तालुक्यात दत्त महाराजांचे अनंत काळ वास्तव्य होतं. नृसिहवाडी हे ठिकाणही त्यापैकीच एक. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरोळची भूमी देवभूमी म्हणूनच ओळखली जाते. दत्त गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांना नृसिहवाडी माहिती आहे. पण, तिथून जवळच असलेल्या दत्त गुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी माहिती आहे.

दत्त महाराजांची उत्सव मूर्ती
दत्त पुराणातील गुरूचरित्रात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. शिरोळच्या नृसिहवाडी मंदिरापासून ६ किमी अंतरावर हे मंदिर आहे. तिथे असलेल्या एका गंगाधर नामक ब्राह्मणाच्या दारात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले. त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला पाणी दिले.
घरात केवळ जोंधळ्याच्या कण्या शिजलेल्या होत्या. पण, त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती. कारण, घरात काही भांडी शिल्लक नव्हती. तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला.

दत्त भोजन पात्र मंदिराचा गाभारा
तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या. त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनूसार दगावरच कण्या वाढल्या. महाराजांनीही अगदी मिटक्या मारत चवीने त्या खाल्ल्या. घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती. त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंक, चक्र, पद्य चिन्हे दगडावर उमटली.

दत्त महाराजांचे भोजनपात्र
महाराजांनी कण्या खाल्ल्या आणि ते अदृश्य झाले. त्या शिळेवर महाराजांची पाच बोटे आणि चिन्हे आजही त्या पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. याकाणी श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात.