वीस दिवसांनंतरही फुटेना अंकुर 

55.jpg
55.jpg



रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा 
नाशिक / तळवाडे दिगर :  
बागलाण तालुक्‍यातील तळवाडे दिगर येथील दहा ते बारा शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा - वीस दिवसांपूर्वी एका नामांकित कंपनीकडून "या' बियाण्याच्या पाचशे पुड्या (प्रती पुडी 225 रूपये या दराने) खरेदी करून आपल्या शेतात पेरल्या. मात्र आज पंधरा ते वीस दिवस उलटूनदेखील शेतात टाकलेले रोप उगवले नसल्याने तळवाडे दिगर येथील देविदास ठाकरे, देविदास पवार, सोपान अहिरे, नामदेव आहिरे, गंगाधर ठाकरे, कडू ठाकरे, शांताराम ठाकरे, रामचंद्र पवार, राजाराम ठाकरे, भरत अहिरे, तुकाराम आहिरे, देविदास पवार यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे सुमारे 500 बियाणे पुड्यांचे नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती तालुक्‍यातील इतर गावांतही असल्याचे बोलले जात असून त्यामुळे परिसरातील उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 


दुष्काळात तेरावा महिना 
कोरोनाचा प्रदुर्भाव व लॉकडाऊनमुळे संपूर्ण उन्हाळाभर शेतकऱ्यांच्या शेतमालास कवडीमोल बाजारभाव मिळाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर कोणी नातेवाईक, शेजाऱ्यांकडून पैसे उसने करून "या' बियाण्याची खरेदी केली. मात्र, दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी बियाणे टाकले खरे मात्र ते उगवलेच नाही. त्यामुळे लागवडीसाठी ठेवलेले शेत देखील आता पिकाभावी शेतकऱ्यांच्या अंगावर पडणार आहे. ते बियाणे कोबी या फळभाजी पिकाचे आहे. 


कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक 
बियाणे उगवले नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र रोप चुकीच्या पद्धतीने टाकले, पाउस जास्त झाला असेल, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना दगा देणाऱ्या सदर कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी व बागलाण प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार बागलाण यांना निवेदन देवून सदर बियाणे कंपनीवर कार्यवाहीची मागणी केली आहे. 


सोयाबिननंतर "या' बियाणाचा दगा 
कोबी उत्पादक शेतकरी देविदास ठाकरे यांनी 15 जून रोजी 6 हजार 750 रुपये खर्च करून 30 पुड्या घेतल्या. योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक शेतात बियाणे पेरले. मात्र, आज 15 दिवस उलटूनही ते उगवलेच नाही. हीच परीस्थिती त्यांच्यासह गावातील दहा-बारा शेतकऱ्यांची असल्याचे सांगून कृषी विभागाने त्वरित पाहणी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. तर कंपनीच्या प्रतिनिधीने कसमादे परिसरात चालू वर्षी कंपनीने 12 क्विंटल बियाण्याची विक्री केली आहे. त्यातील फक्त दोन किलो बियाणे संबंधी अशी तक्रार आलेली आहे. जोरदार पावसामुळे कदाचित असे घडले असेल, तरीही कंपनीकडून प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com