मालेगाव (जि. नाशिक) : वाखारी (ता. नांदगाव) येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाचा तपास महत्वपुर्ण टप्प्यावर पोचला आहे. तब्बल सात महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत. येत्या काही दिवसात या प्रकरणाचा पुर्ण उलगडा होऊन संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
काय घडले होते?
नांदगाव तालुक्यातील वाखारी ते जेऊर शिवारात 7 ऑगस्ट 2020 रोजी एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. वाखारी येथील रिक्षाचालक समाधान चव्हाण (38) त्यांची पत्नी भारतीबाई (30), मुलगा गणेश (6) व मुलगी आरोही (4) असे चौघेजण ठार झाले होते. चव्हाण कुटुंबिय झोपेत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला हाेता. या हत्याकांडानंतर संपुर्ण जिल्हा हादरला होता.
पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात
पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाच पथकांद्वारे तपास केला. मात्र त्यांना कोणताही धागादोरा सापडला नाही. घटनास्थळी कोणताही पुरावा व झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या. त्यामुळे पोलिसांपुढे या हत्याकांडाचा तपास मोठे आव्हान होते. हत्याकांडाच्या तपासात धागेदोरे उकलण्यात पोलिसांना यश आले असून तपासाचा निष्कर्ष अंतिम टप्प्यात आहे. त्यासंबंधीची ठोस माहिती येत्या काही दिवसात उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नांदगाव पोलिस विविध शक्यतांच्या पडताळणी केल्यावर विश्वासू सूत्रांच्या आधारे मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचल्याचे समजते. संशयितांना जेरबंद केल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबींवर उजेड पडण्याची शक्यता आहे. वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात हत्याकांडातील संशयितांना अटक केली जाईल असे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.