
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका हद्दीतील दहावी, बारावीचे वर्ग वगळता उर्वरित वर्ग बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त यांनी घेतला आहे.
नाशिक : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका हद्दीतील दहावी, बारावीचे वर्ग वगळता उर्वरित वर्ग बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा १५ मार्चपर्यंत बंद
गेल्या वर्षी २२ मार्चपासून शाळा बंद केल्या होत्या. वर्षभर शाळा बंद राहिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ४ जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. पाचवी ते आठवीच्या एक लाख दहा हजार ७७३ विद्यार्थ्यांसाठी दोन हजार ६०२ शिक्षकांची नियुक्ती केली होती. एक वर्ग आठवड्यातून तीन दिवस भरेल, असे नियोजन होते. गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांसाठी वर्ग भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक केली होती. २ ते १५ मार्च अशा १३ दिवस शाळा बंद राहतील. पालकांनी संमती दिल्यास दहावी व बारावीचे वर्ग सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..
आजपासून अंमलबजाणी; महापालिका आयुक्तांचा निर्णय
दरम्यान, शाळा नियमित सुरू होत असतानाच, कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत शहरातील पाचवी ते आठवीचे वर्ग १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अकरावीचे वर्गही बंद राहणार असून, दहावी व बारावीचे वर्ग पालकांच्या संमतीनुसार सुरू ठेवले जाणार आहेत.
हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पाचवी ते नववी तसेच अकरावीचे वर्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मार्चपर्यंत वर्ग बंद राहतील.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका